Saturday, March 4, 2023

🛑 शुभ्र मायेचा सागर

           श्यामची आई हा चित्रपट बालपणी पाहिला होता. त्यात आईच्या मायेची थोरवी सांगण्यात सानेगुरुजींनी शब्दांमध्ये जणू प्राणच ओतले आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ' श्यामची आई ' या पुस्तकाला ' पवित्र मंगल स्तोत्र ' म्हटले आहे. 

          कारागृहात बेचाळीस रात्री गोष्टी सांगत असताना त्यांच्या मुखातून आईच्या मायेचा हा सागर ओसंडून वाहत होता. त्यांच्या डोळ्यांतून त्यावेळी अश्रूंचा महासागर वाहत असेल हे वेगळे सांगायला नको.

          आजही ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचताना प्रत्येकवेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले पाहिजेत अशी ही आईवरील निर्व्याज प्रेमाच्या अश्रूंनी लिहिली गेलेली कादंबरी विरळीच म्हणायला हवी.

          शाळेत पहिलीत प्रवेश घेणारी मुले शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी आपल्या आईचं बोट सोडायला तयार होत नसतात. शाळेत स्थिरावली तरी त्यांचं अधिकचं लक्ष घरी आईकडेच लागलेलं असतं. शाळेतील बाईंमध्ये जेव्हा ही मुले आपल्या आईचं रुप पाहतात , तेव्हा कुठे त्यांना थोडाफार आईचा विसर पडत असेल. 

          तरीही शाळा सुटण्याच्या वेळी आईची वाट पाहत बसलेली आणि आई दिसली की वायुवेगाने आईच्या दिशेने धावणारीही मुले पाहिली आहेत. एवढी असते प्रत्येकाला आपल्या आईची ओढ. आपली आई अजून आपल्याला न्यायला आली कशी नाही ? हा प्रश्न पडताच डोळ्यांतून गंगा यमुना आपोआप वाहायला लागतात ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडली असेलच. 

          मुले मोठी होत असली तरी आई मोठी होत नाही. घरी जाताच आईला कडकडून मिठी मारणारी मुले पाहिली की परत लहान व्हावंसं वाटतं. लहान असतानाचे तिच्यासोबतचे हृद्य क्षण आठवतात आणि तिच्या प्रेमाने व्याकुळ व्हायला होतं. डोळ्यातून हलकेच पाणी तरळतं. मायेच्या सागराला जणू भरती येते. 

          शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत होते. एक दुसरीतील आठ वर्षांची मुलगी ' एकल गीत ' म्हणण्यासाठी रंगमंचावर आली. मी सूत्रसंचालक होतो. मुलीने आपले गाणे म्हणायला सुरुवात केली. तिच्या मधुर आवाजाने सर्व प्रेक्षक शांत झाले. गाण्याचे बोल असे होते. 

" आई माझी मायेचा सागर

तिने दिला जीवना आकार

आई वडील माझे थोर

काय सांगू त्यांचे उपकार

जीवनाच्या वाटेवरती 

किती असतो त्यांचा आधार " 

          याही पुढे आईच्या मायेची महती सांगणारे शब्द काव्यरूपाने तिच्या मुखातून बाहेर पडतच होते. मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द ती स्वतः जगत होती. तिची आई तिच्या समोरच प्रेक्षक म्हणून बसली होती. मुलीचं गाणं इतकं हळवं होतं , की ती मुलगी स्वतः हुंदके देत पुढची कडवी म्हणत होती. मलाही गहिवरुन आलं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या पाठीवर आश्वासक हात ठेवला. तिचे गाणे संपेपर्यंत मी कमालीचा निःशब्द झालो होतो. माझी आई मला काही क्षणासाठी माझ्या पाठीवर स्पर्श करुन गेल्याचा भास झाला.

©️ प्रवीण अशितोष कुबल

पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ ( कणकवली )



Sunday, November 27, 2022

🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........मी स्वतः

  🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........

🔹 प्रवीण कुबल यांच्याबद्दल थोडेसे ....

          अभ्यासूवृत्ती मानवाला ज्ञानाच्या शिखरावर नेते. यामुळे माणसाकडे शांती, संयम आणि व्यक्तिमत्व विकास करण्याची क्षमता येते. असेच अभ्यासू व्यक्तिमत्व, संघटनात्मक प्रचंड अनुभव, कुशल संघटक, समाजात विविध पद भुषविलेले, कार्यक्षम  समाजसेवक, शांत, संयमी पण परखड व्यक्तिमत्व, 

नाभिक समाजाची आन , बान , शान...  आपले सर्वांचे लाडके आधारस्तंभ, सत्यवादी मार्गदर्शक एक निस्वार्थी शिल्पकार 

सन्माननीय श्री. प्रवीण अशितोष कुबलसर .....

आपणांस वाढदिवसाच्या

मन:पुर्वक शुभेच्छा .....🌹

          शिक्षक कसा असावा ही प्रेरणा आपण समाजासाठी देऊन , भालचंद्र बाबांच्या कणकवली नगरीने आपणाला मोठे केले. किर्लोसचे गावचे भाग्यविधाते आणि गरीबांचा कल्पतरु. सन्माननिय श्री. प्रवीण अशितोष कुबल सर , आज आपला ४७ वा वाढदिवस. या जन्मदिनानिमित्त , आजपर्यंत तुम्ही केलेल्या जनसेवेबद्दल भरपुर  लिहीण्यासारखे आहे. परंतु वेळेअभावी तुमची प्रगती व जनसेवा थोडक्यात लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

          🔹माझ्या भावना आपल्या पर्यंत व्यक्त करण्यासाठी तशी वेळच आली नाही. परंतु या भावना , ही तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न..........

          तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, आव्हान म्हणून जगणारे आपण प्राविण्यशिल अरुणोदय आहात. अनंताच्या कृपेने,  मिळालेलं आयुष्य , म्हणजे आपल्यासाठी केवळ आनंद आणि मजा असं कधीच नव्हतं. आपल्यासाठी, आयुष्य म्हणजे येणारा प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्विकारणं आणि जिद्दीने त्याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य मानलात....

          आयुष्य म्हणजे संघर्ष  आहे. हे तुम्ही तुमच्या जीवनात शिकलात. म्हणुनच संकट म्हणुन आलेल्या प्रसंगाला सामोरे गेलात. त्याचबरोबर  समाजाची सेवा करतांना भगवंताचा आशिर्वाद व तुमची प्रचंड इच्छाशक्ती (आत्मविश्वास) हाच तुमच्या जीवनात महत्वाचा ठरला. आपले संघर्षमय जीवन तुमच्या संसाराबरोबर , नाभिक बांधवांनाही फायदेशीर झाला. तुमचे विचार, अनमोल मार्गदर्शन समाज बांधवांना मिळत आहे. हे समाजाचे भाग्य आहे. तुम्ही नाभिक समाजाचे आधारस्तंभ बनलात. म्हणुनच आम्हांला आपला सार्थ अभिमान आहे.

          आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो ! हीच रामेश्वर व योगी भालचंद्र महाराज यांच्या चरणी  प्रार्थना. 🙏

  शुभेच्छुक :

🔸 पत्रकार गणेश चव्हाण , श्रावण ९४२००८४१२५

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿



Saturday, November 19, 2022

🛑 निष्पाप मुलांचा विश्वास

🛑 निष्पाप मुलांचा विश्वास 

          सहा तास मुलांसोबत असले तरी शिक्षक म्हणजे मुलांचे आदर्श व्यक्तिमत्त्व असतात. पूर्ण दिवसाच्या पाव भागापुरते मुलांसमोर वावरणारे शिक्षक अप्रत्यक्षपणे मुलांसोबतच असतात. ही मुलेही शिक्षकांच्या सदासर्वदा डोळ्यासमोर येत राहतात. कारण शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांसारखंच नव्हे , तर त्याहीपेक्षा जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न करतात. 

          कधी त्यांना रागावतात , त्यांना चापटी देतात. छोटी मुलं हे सर्वकाही काही क्षणात विसरुन जातात. मात्र ओरडल्यानंतर त्यांना जवळ घेणे , नीट समजावून सांगणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. 

          शिक्षक होणं कदाचित सोपं असू शकतं , पण शिक्षक म्हणून जगणं एक कठीण गोष्ट आहे. त्यासाठी मुलांच्या भावविश्वात डोकावायला हवे. हे एकदा जमले की तुमच्या समोरची मुले तुमची मुले होऊन जातात. ती तुमच्यावर इतका विश्वास ठेवतात की पालकांवरही त्यांचा तितका विश्वास नसतो. 

          तुम्ही मुलांना एखादा शब्द देता , तेव्हा त्या शब्दाला जागणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मुलांचा तुमच्यावरील विश्वास कमी होण्याची भीती असते. शिकवताना बोलता बोलता आपण मुलांना विविध उपक्रमांची माहिती देत असतो. ते करवून घेत असतो. उपक्रम असला की मुलं त्यात अधिक लक्ष घालतात. आपण शिकवतोय असं मुलांना वाटलं तर मुलांचं लक्ष विचलित होऊ शकतं. 

          याचा अर्थ असा आहे की मुलांना शिकायला आवडत असतं , पण शिकवून घ्यायचा कंटाळा येत असतो. एखादी गोष्ट त्यांना करायला दिली की ती लगेच तयार होतात. भाग न घेणारी मुलेही त्यात भाग घेऊ लागतात. 

          आज आमच्या शाळेतील मुलांना शिक्षक होण्याची संधी दिली होती. दोन दिवस मुलं आपण शिक्षक बनणार या कल्पनेनेच अधीर झाली होती. शनिवारी सकाळची शाळा म्हणजे थोडी उशिरा येणारी मुले आज मात्र शिक्षक बनून लवकर शाळेत दाखल झाली होती. त्यांच्या अंगात आज शिक्षक शिक्षिका संचारल्या होत्या.

          सर्व विद्यार्थी आजच्या नव्या शिक्षकांना सर ,मॅडम म्हणत होती. ते ऐकताना नवीन शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज त्यांना शिक्षकांसारखे खुर्चीत बसायला मिळाले होते. 

          नव्या टिचर्सनी छान प्रार्थना घेतली. विद्यार्थी असताना लुडबुड करणारे शिक्षक आज मात्र गंभीरपणे प्रार्थना म्हणताना दिसत होते. त्यांचा एक दिवसाचा शिक्षक होण्याचा आनंद देत असताना आम्हां  शिक्षकांनाही नवीन शिक्षकांबद्दल अतीव आदर वाटत होता. शिक्षकांचा पेहराव मुलांच्या तनामनात शिक्षकांचं जगणं पेरुन गेला होता. शाळा सुटेपर्यंत विद्यार्थ्यांनी केलेली शिक्षकांची भूमिका शिक्षकी पेशाला साजेशी अशीच होती. नवीन शिक्षक मुलांना प्रेमाने शिकवत होते. कुणी आपल्या फळ्यावरील तिरप्या अक्षराला पाहून हसत सुटले होते. मी वर्गावर्गात जाऊन त्यांचे फोटो घेत होतो. कुणाचेही फोटोकडे लक्ष नव्हते. प्रत्येक शिक्षक आपल्या वाटणीला आलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात दंग असलेले पाहून मलाही तोंडात बोट घालण्याची वेळ आली. 

          ही छोटी मुले इतकी निष्पाप असतात की त्यांचा आपल्या शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीवर ठाम विश्वास असतो. या मुलांचे पालकही लहानपणी तसेच असले पाहिजेत. त्यांचाही आपल्या शिक्षकांवर विश्वास होताच असणार. हा शिक्षकांबद्दलचा आदर आणि विश्वास सदासर्वकाळ वाढवत नेण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर ? 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली

( 9881471684 )




Sunday, October 30, 2022

लिहिते व्हा

 ⚫ लिहिते व्हा ........ 

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे. मजेत ना ? अर्थात मजेतच असणार म्हणा. कारण तुम्हाला सध्या दिवाळीची हिवाळी सुट्टी आहे ना ? दिवाळीत मौज मज्जा करत असाल तर हे वाचायलाही तुमच्याकडे वेळ नसेल याचीही खात्री आहे. तरीही वाटलं , तुमच्याशी थोडं बोलावं. मला तर तुमची आठवण येते आहे. तुम्हाला ती येत असेल किंवा नसेलही. असो. तुम्ही तुमच्या दिवाळी सुट्टीत काहीतरी भन्नाट करत असणार ना ? म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या अनेक उत्तम गोष्टी करण्यात दंग असाल. तुमच्या कारागिरीची दाद द्यायलाच पाहिजे. पण तुम्हाला या सर्व कार्यभारातून उसंत मिळाली तर तुम्ही काही काळ लिहिण्याचा प्रयत्न करता काय ? सध्या लिहिणे ही दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे.

          चॅटिंग पुरते लिहिणे शिल्लक राहिलेले आहे. तेही शॉर्टकट्स वापरुन लिहिलेले असते. त्यात शुद्धलेखनाच्या प्रत्येक शब्दांत चुका पाहिल्या की वाचणाऱ्याला पुढच्या पिढीच्या लेखनाविषयी काळजी वाटायला लागते. म्हणून तुम्ही जसे वाचन करता , तसे लेखन करण्यासाठी मुद्दामहून वेळ काढला पाहिजे. कोणताही विषय घेऊन त्यावर पाच , दहा ओळीत लिहिता आले पाहिजे. निबंध लिहायचा असेल तर अधिकच उत्तम.

          तो लिहिताना तर तुम्हाला तुमच्या मनातील विचार अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झालेली असते. तुम्ही एकदा लिहायला सुरुवात केलीत ना , मग तुम्हाला विचार करण्यासाठी डोकं चालवावं लागतं. तुमचं डोकं चालायला लागतं आणि तुमचं लेखन कागदावर उतरु लागतं. तुमच्या लक्षातही येणार नाही की तुम्ही किती छान लिहिताय ते !!!

          तुमच्याकडून एक सकस लेखन घडू लागण्याची ती सुरुवात असते. मात्र ही सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जमेल ते. प्रयत्न केलात तर तुम्ही कितीतरी छान छान निबंध , लेख , कविता , सुविचार लिहू शकाल.

          तुम्हालाच तुमचं आश्चर्य वाटेल की तुम्ही किती सुंदर लेखन करु शकताय ते !!! आता आधी सोप्या , साध्या विषयांवर लिहायला प्रारंभ करा. जे सुचेल ते लिहीत चला , ते नको वाटेल तेव्हा खोडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे ना !! अक्षर वळणदार असले तर आणखी उत्तम.

          तुमचं लेखन व्याकरणदृष्ट्या बरोबर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. लागू दे वेळ. होईल तेही बरोबर. थोडा संयम ठेवा.

          आज लिहायला सुरुवात केलीत आणि उद्या लेखक झालात असे होऊ शकणार नाही. त्यासाठी वाट बघावी लागेल. खूप चांगलं वाचावं लागेल. खूप चांगला विचार करावा लागेल.

खूप चांगलं ऐकावं लागेल. हे सगळे करता करता हळूहळू आपल्या लेखनाची गुणवत्ता वाढत जाईल हे तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही लिहिलेले दुसरे कोणीतरी वाचणार आहेत हे लक्षात घेऊन जर लेखन केलेत तर तुमचे लेखन वाचनीय बनावे यासाठी तुम्ही विचारपूर्वकच लिहाल. तुमच्या लेखनाला कोणीही प्रतिसाद देतील तेव्हा तुमचा आनंद कुठेही मावणारा नसेल.

          म्हणून लेखनाची कास धरा. पेनाने लिहिलात तर ती एक चांगली सवय आहे. तुम्ही लिहिलेले तुमच्या दैनिक वहीत संग्रहित होईल. तुमच्या स्वतःच्या रचना वाचताना तुम्हाला स्वर्ग अगदी जवळ आल्यासारखा वाटेल.बघा तरी करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



Saturday, October 22, 2022

🛑 सख्खे भाऊ शेजारी , भेट नाही संसारी

 🛑 सख्खे भाऊ शेजारी , भेट नाही संसारी

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे , मजेत ना ? काय झालं ? डोळे चुरचुरताहेत ? रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर होता काय ? नाही म्हणजे त्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं झालं असेल तर तुम्हाला सकाळी तसं होण्याची शक्यता नक्कीच असू शकते. 

          हे दोन सख्खे भाऊ आहेत. पण त्यांची भेट कधीच घडत नाही. ज्यांच्यामुळे आपण सारी दुनिया पाहू शकतो , त्यांच्याबद्दल आज आपण बोलतोय. आता तुम्ही हे वाचताय ना !! त्यावेळी त्या दोन सख्ख्या भावांचीच मदत घेताय ना ? हे दोन्ही भाऊ जबरदस्त आहेत. ते नसले असते तर आपलं जीवन शुष्क बनून गेलं असतं. ज्यांच्याकडे या धनाची कमतरता आहे , त्यांनाच ते नसण्याचं दुःख काय असेल ते सांगू शकतात. 

          एकदा आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळून बघा. मग समजेल तुम्हाला !! किती अवघड असेल असं नित्य जगणं !! याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. 

          आपण डोळस आहोत याचा अभिमान बाळगा. ह्या डोळ्यांची दोन पाखरे सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेण्यास आतुर झालेली असतात. या डोळ्यांनी काय पाहायचे हे त्या डोळ्यांना माहित नसते. ते नजर जाईल तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यांनी काय बघायचे आणि काय बघायचे नाही हे आपण शिकवायचे असते. 

          सृष्टीत खूप काही सामावलेले आहे. हे सगळं आपल्याला आजन्म डोळे भरुन पाहायचे आहे. त्यांना डोळ्यात साठवून ठेवायचे आहे. कितीवेळा तरी या दोन्ही डोळ्यांचे पारणे फिटले असेल अशा गोष्टी आपण पाहत आलो आहोत. अजून पाहणार आहोत. पण ज्या डोळ्यांनी आपण सारं जग पाहणार आहोत , त्या डोळ्यांची काळजी घेणं ही सध्याच्या काळाची नितांत गरज बनली आहे. 

          तुम्हां लहान मुलांना अल्पवयात लागलेले जाड काचेचे चष्मे बघून तर आम्हीही हवालदिल झालो आहोत. कसं होणार यांचं म्हातारपणी ? पूर्वीच्या लोकांना म्हातारपणापर्यंत चष्मा माहितीच नव्हता. हे चष्म्याचं गिफ्ट नको रे बाबा. 

          चष्मा असणं ही काही चांगलं दिसण्यासाठी परिधान केलेले आभूषण नाही. ते दिसण्यासाठीचं यंत्र आहे हे लक्षात आलं तरी पुरे आहे. काही मुलांना चष्मा हवा असतो. तुम्हाला जर चांगलं दिसत असेल तर चष्म्याचा अट्टाहास कशासाठी ? तो घालून काय तुमच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे का ? अजिबात नाही. उलट तुम्हाला यापुढे त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. हा चष्मा नसेल तर तुमचं दरवेळी अडणार आहे. तुम्हाला निसर्गाने दिलेले दोन डोळे असताना , पुन्हा हे आणखी दोन डोळे मागून घेणं हे कधीही वाईटच असणार आहे. 

          म्हणजे बघा. डोळे ही आपली फार मोठी संपत्ती आहे. सगळ्यात मोठी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेणे तुमच्याच हातात आहे. 

          त्यासाठी रोज उठल्यावर तुमचे हे दोन्ही मित्र चांगल्या स्वच्छ पाण्याने प्रेमाने धुवून घ्या. उगीच कसलीही बोटे डोळ्यात घालू नका. डोळा हे आपले नाजूक ज्ञानेंद्रिय आहे. पापणी , बुबुळ , बाहुली , पापणीचे केस ही त्याची उपइंद्रियेही महत्त्वाची कामे करतात. जरा जास्त डोळा चोळलात तर तो लाल होतो. तुम्ही रागावला असाल तरीही ते लालेलाल होतात. तुम्ही शांत असताना तुमचे डोळेही शांत झालेले असतात. डोळ्यांवर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

          डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय डोळ्यांत कोणताही ड्रॉप घालू नका. त्यांचा सल्ला घेऊनच डोळ्यांवर उपचार करा. 

          रात्रीच्या काळोखात तुमच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडू देऊ नका. सूर्याकडे थेट पाहू नका. प्रखर प्रकाशाकडे पाहिल्यामुळे तुमच्या डोळ्यांतील स्नायूंना इजा पोहोचेल. अर्थात तुमची दिसण्याची क्षमता कमी होत जाईल. म्हणून अधिक काळजी घ्या. 

          पुस्तक वाचन करताना खूप जवळ किंवा खूप लांब धरुन वाचू नका. ठराविक एक ते सव्वा फुटाचं अंतर ठेवूनच वाचन करा. बरंच वाचन झालं , तर थोडा वेळ डोळ्यांची उघडझाप करा. डोळ्यांना व्यायाम द्या. एक दोन मिनिटे डोळे निवांत बंद ठेवा. आणि पुन्हा फ्रेश होऊन वाचन करा. जवळ साधं थंड पाणी असेल , तर ते डोळ्यांना लावा. बरे वाटेल. 

          पूर्वी आमची आई आम्ही घरी आलो की आमच्या डोळ्यांना पाणी लावायची आणि मगच घरात घ्यायची. डोळ्यांचे खूप काम झाले असेल तर त्यांना विश्रांती दिल्याशिवाय गत्यंतर नाही. ज्यांचा आपण आजन्म वापर करणार आहोत , त्यांना जपणं हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. चला , माझेही डोळे आता दुखू लागले आहेत , मीही त्यांना थोडी विश्रांती देतो.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )






Wednesday, October 19, 2022

🛑 ग्रेट सायकलस्वार : उमेश मोरे

 🛑 ग्रेट सायकलस्वार : उमेश मोरे

          सहावीच्या पुस्तकात एक धडा आहे. ' सायकल म्हणते मी आहे ना !! ' या धड्यामध्ये सायकलचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले आहे. इंधनाशिवाय चालणारी आणि फुफ्फुसांना व्यायाम देणारी ही दुचाकी खरंच खूप गरजेची बनली आहे. आज खूप कमी लोकांना सायकलचे महत्त्व समजू लागले आहे. 

          त्या खूप कमी लोकांमध्ये आमच्या ' उमेश मोरे ' या शिक्षकमित्राचा अगदी वरचा क्रमांक लागेल. मोरे हे सायकलक्षेत्रात MORE ( मोअर ) कामगिरी केलेले सायकलस्वार असावेत. त्यांची कामगिरी कायम सुरु असते. ते घरी निवांत बसलेले पाहायला मिळणार नाहीत. त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी सायकलची निवड केली आहे. त्यांचं आपल्या सायकलवर जिवापाड प्रेम आहे. त्यांची सायकल एकदा सुरु झाली की इप्सित स्थळाला पोहोचेपर्यंत थांबत नसते. 

          कोरोना काळात उमेश मोरे सरांना ( अस्थमा ) तब्येतीचा कमालीचा त्रास सुरु झाला होता. तरीही त्यांनी आपल्या महत्त्वाकांक्षेने त्यावर मात केली. सायकलमुळे त्यांचा अस्थमा पळून गेला. सायकल चालवताना जास्त सराव झाल्यानेही त्यांच्या पायाला इजा पोहोचली होती. त्याकडे दुर्लक्ष करत पुन्हा आपले सायकलस्वार निघाले पुढील फिरस्तीला. 

          त्यांनी एकदा ठरवले कि ठरवले. मग थांबणे त्यांना माहिती नाही. त्यांचे निर्णय चिरकाल टिकणारे असतात. त्यांचं इंग्रजी विषयाचं ज्ञान सखोल आहे. त्यांनी आपल्या घरी पुस्तकाचं घर उत्तमप्रकारे जोपासलं आहे. त्यांना वाचनाची नितांत आवड आहे. त्यांची मैत्री चोखंदळ असते. ते शक्यतो एखाद्याशी मैत्री करत नाहीत , आणि जर मैत्री केलीच तर ती कधी तुटू देत नाहीत. त्यांच्या सानिध्यात आल्याशिवाय ते संपूर्णपणे समजू शकणार नाहीत. 

          कोरोनाकाळात चेकपोस्टवर काही दिवस आम्ही एकत्र काम केल्यामुळे ते माझे एक चांगले सोबती झाले आहेत. मी लिहिलेले लेख ते मनापासून वाचतात आणि त्यावर आपली परखड मते व्यक्त करतात. 

          त्यांना हल्लीच एका सायकल मॅरेथॉनमध्ये  सलग ३०० किमी ते ४०० किमी सायकल रपेट मारताना दोन वेळा अपयश मिळाले. तरीही ते डगमगले नाहीत. त्यांनी आपला सराव सुरुच ठेवला. तिसऱ्या प्रयत्नात त्यांना अभूतपूर्व असं यश मिळालं. अपयश मिळालं म्हणून ते नाउमेद झाले नाहीत , त्यांनी मोठया उमेदीने अवघड स्पर्धा जिंकून मी ही जिंकू शकतो हे सिद्ध करुन दाखवले आहे. 

          ' सायकल म्हणते , मी आहे ना ! ' असं पाठाचं नाव उलट करावं लागेल. आता तेच सायकलला म्हणतील , " सायकलबाई , मी आहे ना !!! " उमेश मोरे हे नाव पुढील काही दिवसांत , महिन्यांत किंवा वर्षांत सायकलसाठी प्रचंड प्रसिद्ध झालेलं असेल ही आम्हां शिक्षकमित्रांसाठी सदैव अभिमानाची गोष्ट असेल. " उमेशराव , तुम्ही सायकलने पुढे चला , आम्ही टू व्हीलरने तुमच्यामागून येतोय " असं म्हटलं तरी तेच आमच्या पुढे जातील एवढाही आत्मविश्वास त्यांनीच आमच्यात पेरलाय. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471674 )




गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...