Monday, September 16, 2024

🛑 चिंतन हा चिंतामणी

🛑 चिंतन हा चिंतामणी

          गणेश चतुर्थीला आपल्या चिंतामणीचं दर्शन आपल्याला घडलं आहे. सर्व चिंतांना दूर पळवणारा हा चिंतामणी. हा लेख वाचेपर्यंत तुम्हां मुलांची ' गणेश चतुर्थी सुट्टी ' नंतर शाळा सुरु झालेली असेल ना ?

          नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे ? चिंतामुक्त झालात ना ? शाळा सुरु झाली म्हणून चिंताग्रस्त तर झाला नाहीत ना ? तशीही शाळा तुम्हाला खूपच आवडते म्हणा. गणपती जसा आवडीचा, तशी शाळा तुमच्या लाडकीची म्हणायला हरकत नाही. 

          आज आपण आपलं चित्त एका वेगळ्या गोष्टीकडे केंद्रीत करणार आहोत. आपण ' चिंतन ' करणार आहोत. आपल्या गणपतीला ' चिंतन ' करायला खूप आवडे. आपण त्याची ही सवय जोपासुया. चिंतन करायला हवं म्हणजे नेमकं काय करायचं ? हा प्रश्न तुम्हाला पडणार हे मला माहिती आहे. 

          तुम्ही एखादी गोष्ट करता म्हणजे काय करता ? ती करण्यापूर्वी विचार करता. हा विचारच तुम्हाला एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यासाठी प्रेरित करीत असतो. तुम्ही कितीतरी गोष्टी करत असता. ती चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल. पण ती चांगली नाही असे तुम्हाला नंतर कळते. मोठी माणसे तुम्हाला त्याची जाणीव करुन देत असतात. त्यावेळी तुम्हाला रागही येतो. कारण तुम्ही केलेली गोष्ट तुम्हाला बरोबर आहे असे वाटणे साहजिकच असते. ती खरंच चुकीची होती किंवा बरोबर होती याचा तुम्ही सारासार विचार करु लागता, तेव्हा तुम्ही जो विचार करत असता, ते म्हणजे ' चिंतन ' असते. 

          आज आणि सतत हे चिंतन करणे खूप गरजेचे बनले आहे. कारण या चिंतनाने तुम्ही स्वतःच स्वतःचे मूल्यमापन करत असता. स्वतः स्वतःचे मूल्यमापन करणे कधीही चांगले असते. कारण तुम्ही तुमच्या वाईट सवयी घालवण्यास स्वतःच स्वतःला मदत करत असता. बघा, तुम्हाला नक्की जमेल.

         " प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे " या सुवचनानुसार तुम्ही सतत प्रयत्नांची कास धरुन चाला तरच तुमचा कस लागेल. तुमच्या चिंता दूर करणारा चिंतामणी तुमच्या सोबत आहेच. तुम्हाला चिंता सतावू नये. तुम्ही तिचा अजिबात बाऊ करायचा नाही. चिंतेने चिंताग्रस्त व्हायचे नाही. त्रयस्थपणे विचार करायचा. चिंतन करुन त्यातून सन्माननीय मार्ग काढायचा. स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बनायचे. तुम्हाला मार्ग सापडताना दिसेल तेव्हा तुम्हाला जो आनंद झालेला असेल, त्याचे वर्णनही तुम्ही करु शकणार नाही. 

          लहानपणी मी रेडिओवर ' चिंतन हा चिंतामणी ' नावाचा कार्यक्रम नेहमी ऐकत असे. त्याचा मला खूपच फायदा झाला. आता तुमच्याकडे रेडिओ नसेल हे मला माहिती आहे. कारण त्याची जागा आता मोबाईलसारख्या यंत्राने घेतली आहे. त्याचा उपयोग जरुर करा, पण त्याच्या आहारी अजिबात जाऊ नका. नाहीतर त्यावर ' चिंतन ' करा आणि त्यावर तुमचं काय मत तयार होतं ते लिहून काढा. माझ्या लाडक्या मुलांनो, तुम्ही खूप चांगली मुलं आहात, अधिक चांगली व्हा. मला तुम्हाला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Saturday, September 7, 2024

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१


Tuesday, September 3, 2024

🛑 आधी गणाला मनी साठवावा

🛑 आधी गणाला मनी साठवावा


          गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले कि सगळ्यांचीच लगबग सुरु होते. मुलांना सुट्टी पडणार म्हणून मुले खुशीत असतात. आकारिक चाचणी पहिली पार पडलेली असते. शाळेत विविध उपक्रम सुरुच असतात. विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची रस्सीखेच सुरु झालेली असते. 

          मुले घरातील सजावटीत रमलेली असतात. भिंतीना रंग, सफाई, मखर बनवणे, गणेशमूर्ती बघायला जाणे अशी कामे मुलांची आवडीची. अभ्यासापेक्षा मुले यात जास्त रमतात. त्यात त्यांना आपल्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागलेली असते. कधी एकदा तो दिवस येतो असे त्यांना झालेले असते. तबला, डग्गा, सुरपेटी, ढोलकी, मृदूंग आणि चकी ( झांज )  यांना बाहेर काढण्यात येते. खूप दिवसानंतर आपल्यावर थाप बसणार म्हणून वादयेही खुशीत वाजू लागतात. 

          घरातलं वातावरण पूर्ण उत्साहाच्या धबधब्यांनी  न्हाऊन निघतं. मुंबईची मंडळी नेहमीच दोन दिवस अगोदर येतात. त्यांची ' मुंबईची बोली ' घरोघर घुमू लागते. मराठी आणि गावाकडच्या मिश्र भाषेने गप्पा रंगून जातात. चाकरमानी आल्यामुळे गावाकडले म्हातारेशितारे पुन्हा तरुण बनून कामात हातभार लावू लागतात. 

          पताका कापून त्या लावण्यातील मज्जा काही औरच असते. सर्व भिंतीवर कॅलेंडरे झळकू लागतात. गणपतीची खोली हा हा म्हणता सजून जाते. बाप्पासाठी आरास करताना अजिबात कंटाळा येत नाही. अंगातील आजारपण कुठल्या कुठे निघून जाते.

          छतांवर रंगीबेरंगी पडदे झुलू लागतात. बघावं तिकडे पाहत राहावं असं वातावरण असतं. एवढं प्रसन्न चित्त होण्यासाठी फक्त एकमेव ' गणपती बाप्पा ' कारणीभूत असतो. 

          हौशी भजन मंडळे तयारीला लागतात. त्यांची रंगीत तालीम सुरु झालेलीच असते. एकापेक्षा एक उडत्या चालीवर गाणी बसविण्याची जणू स्पर्धाच सुरु होणार असते. गणपतीवर कित्येक गाणी रचली जाण्याचा काळ असतो हा. सारेजण गणपतीमय होऊन जातात. जीवनातील अनेक प्रसंगांना तोंड देताना त्यावर मात करायला शिकवणारा प्रत्येकाचा ' माझा बाप्पा ' तनमनात येत राहत असतो. 

          चतुर्थीचा दिवस उजाडतो आणि आनंदाला उधाण येते. आपल्या बाप्पाचं आगमन प्रतिवर्षी हवंहवंस वाटणारं असंच असतं. घरातील मुलेमाणसे गणपतीसाठी एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना पाहून थोरामोठ्यांची छाती फुलून येते. आरत्या, भजने आणि खाद्यपदार्थांची रेलचेल सुखावून जाते. माणसे तनाने आणि मनाने सुद्धा अधिकाधिक जवळ येऊ लागतात. 

          गणपतीसाठी आतून आतुर झालेली माणसे पाहून हा गणेशोत्सव कधी संपूच नये असं वाटत राहत असतानाच त्याच्या विसर्जनाच्या वेळी डोळ्यातून पाणी तरळते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, " आधी गणाला मनी साठवावा " 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १











गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...