Sunday, October 30, 2022

लिहिते व्हा

 ⚫ लिहिते व्हा ........ 

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे. मजेत ना ? अर्थात मजेतच असणार म्हणा. कारण तुम्हाला सध्या दिवाळीची हिवाळी सुट्टी आहे ना ? दिवाळीत मौज मज्जा करत असाल तर हे वाचायलाही तुमच्याकडे वेळ नसेल याचीही खात्री आहे. तरीही वाटलं , तुमच्याशी थोडं बोलावं. मला तर तुमची आठवण येते आहे. तुम्हाला ती येत असेल किंवा नसेलही. असो. तुम्ही तुमच्या दिवाळी सुट्टीत काहीतरी भन्नाट करत असणार ना ? म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या अनेक उत्तम गोष्टी करण्यात दंग असाल. तुमच्या कारागिरीची दाद द्यायलाच पाहिजे. पण तुम्हाला या सर्व कार्यभारातून उसंत मिळाली तर तुम्ही काही काळ लिहिण्याचा प्रयत्न करता काय ? सध्या लिहिणे ही दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे.

          चॅटिंग पुरते लिहिणे शिल्लक राहिलेले आहे. तेही शॉर्टकट्स वापरुन लिहिलेले असते. त्यात शुद्धलेखनाच्या प्रत्येक शब्दांत चुका पाहिल्या की वाचणाऱ्याला पुढच्या पिढीच्या लेखनाविषयी काळजी वाटायला लागते. म्हणून तुम्ही जसे वाचन करता , तसे लेखन करण्यासाठी मुद्दामहून वेळ काढला पाहिजे. कोणताही विषय घेऊन त्यावर पाच , दहा ओळीत लिहिता आले पाहिजे. निबंध लिहायचा असेल तर अधिकच उत्तम.

          तो लिहिताना तर तुम्हाला तुमच्या मनातील विचार अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झालेली असते. तुम्ही एकदा लिहायला सुरुवात केलीत ना , मग तुम्हाला विचार करण्यासाठी डोकं चालवावं लागतं. तुमचं डोकं चालायला लागतं आणि तुमचं लेखन कागदावर उतरु लागतं. तुमच्या लक्षातही येणार नाही की तुम्ही किती छान लिहिताय ते !!!

          तुमच्याकडून एक सकस लेखन घडू लागण्याची ती सुरुवात असते. मात्र ही सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जमेल ते. प्रयत्न केलात तर तुम्ही कितीतरी छान छान निबंध , लेख , कविता , सुविचार लिहू शकाल.

          तुम्हालाच तुमचं आश्चर्य वाटेल की तुम्ही किती सुंदर लेखन करु शकताय ते !!! आता आधी सोप्या , साध्या विषयांवर लिहायला प्रारंभ करा. जे सुचेल ते लिहीत चला , ते नको वाटेल तेव्हा खोडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे ना !! अक्षर वळणदार असले तर आणखी उत्तम.

          तुमचं लेखन व्याकरणदृष्ट्या बरोबर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. लागू दे वेळ. होईल तेही बरोबर. थोडा संयम ठेवा.

          आज लिहायला सुरुवात केलीत आणि उद्या लेखक झालात असे होऊ शकणार नाही. त्यासाठी वाट बघावी लागेल. खूप चांगलं वाचावं लागेल. खूप चांगला विचार करावा लागेल.

खूप चांगलं ऐकावं लागेल. हे सगळे करता करता हळूहळू आपल्या लेखनाची गुणवत्ता वाढत जाईल हे तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही लिहिलेले दुसरे कोणीतरी वाचणार आहेत हे लक्षात घेऊन जर लेखन केलेत तर तुमचे लेखन वाचनीय बनावे यासाठी तुम्ही विचारपूर्वकच लिहाल. तुमच्या लेखनाला कोणीही प्रतिसाद देतील तेव्हा तुमचा आनंद कुठेही मावणारा नसेल.

          म्हणून लेखनाची कास धरा. पेनाने लिहिलात तर ती एक चांगली सवय आहे. तुम्ही लिहिलेले तुमच्या दैनिक वहीत संग्रहित होईल. तुमच्या स्वतःच्या रचना वाचताना तुम्हाला स्वर्ग अगदी जवळ आल्यासारखा वाटेल.बघा तरी करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



No comments:

Post a Comment

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...