Saturday, October 22, 2022

🛑 सख्खे भाऊ शेजारी , भेट नाही संसारी

 🛑 सख्खे भाऊ शेजारी , भेट नाही संसारी

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे , मजेत ना ? काय झालं ? डोळे चुरचुरताहेत ? रात्री उशिरापर्यंत मोबाईलवर होता काय ? नाही म्हणजे त्यामुळे तुमच्या झोपेचं खोबरं झालं असेल तर तुम्हाला सकाळी तसं होण्याची शक्यता नक्कीच असू शकते. 

          हे दोन सख्खे भाऊ आहेत. पण त्यांची भेट कधीच घडत नाही. ज्यांच्यामुळे आपण सारी दुनिया पाहू शकतो , त्यांच्याबद्दल आज आपण बोलतोय. आता तुम्ही हे वाचताय ना !! त्यावेळी त्या दोन सख्ख्या भावांचीच मदत घेताय ना ? हे दोन्ही भाऊ जबरदस्त आहेत. ते नसले असते तर आपलं जीवन शुष्क बनून गेलं असतं. ज्यांच्याकडे या धनाची कमतरता आहे , त्यांनाच ते नसण्याचं दुःख काय असेल ते सांगू शकतात. 

          एकदा आंधळी कोशिंबीर हा खेळ खेळून बघा. मग समजेल तुम्हाला !! किती अवघड असेल असं नित्य जगणं !! याची कल्पना केली तरी अंगावर शहारे येतात. 

          आपण डोळस आहोत याचा अभिमान बाळगा. ह्या डोळ्यांची दोन पाखरे सतत नवनवीन गोष्टींचा शोध घेण्यास आतुर झालेली असतात. या डोळ्यांनी काय पाहायचे हे त्या डोळ्यांना माहित नसते. ते नजर जाईल तिथपर्यंत जाऊन पोहोचतात. त्यांनी काय बघायचे आणि काय बघायचे नाही हे आपण शिकवायचे असते. 

          सृष्टीत खूप काही सामावलेले आहे. हे सगळं आपल्याला आजन्म डोळे भरुन पाहायचे आहे. त्यांना डोळ्यात साठवून ठेवायचे आहे. कितीवेळा तरी या दोन्ही डोळ्यांचे पारणे फिटले असेल अशा गोष्टी आपण पाहत आलो आहोत. अजून पाहणार आहोत. पण ज्या डोळ्यांनी आपण सारं जग पाहणार आहोत , त्या डोळ्यांची काळजी घेणं ही सध्याच्या काळाची नितांत गरज बनली आहे. 

          तुम्हां लहान मुलांना अल्पवयात लागलेले जाड काचेचे चष्मे बघून तर आम्हीही हवालदिल झालो आहोत. कसं होणार यांचं म्हातारपणी ? पूर्वीच्या लोकांना म्हातारपणापर्यंत चष्मा माहितीच नव्हता. हे चष्म्याचं गिफ्ट नको रे बाबा. 

          चष्मा असणं ही काही चांगलं दिसण्यासाठी परिधान केलेले आभूषण नाही. ते दिसण्यासाठीचं यंत्र आहे हे लक्षात आलं तरी पुरे आहे. काही मुलांना चष्मा हवा असतो. तुम्हाला जर चांगलं दिसत असेल तर चष्म्याचा अट्टाहास कशासाठी ? तो घालून काय तुमच्या सौंदर्यात मोलाची भर पडणार आहे का ? अजिबात नाही. उलट तुम्हाला यापुढे त्याची सवय करुन घ्यावी लागणार आहे. हा चष्मा नसेल तर तुमचं दरवेळी अडणार आहे. तुम्हाला निसर्गाने दिलेले दोन डोळे असताना , पुन्हा हे आणखी दोन डोळे मागून घेणं हे कधीही वाईटच असणार आहे. 

          म्हणजे बघा. डोळे ही आपली फार मोठी संपत्ती आहे. सगळ्यात मोठी संपत्ती. या संपत्तीची काळजी घेणे तुमच्याच हातात आहे. 

          त्यासाठी रोज उठल्यावर तुमचे हे दोन्ही मित्र चांगल्या स्वच्छ पाण्याने प्रेमाने धुवून घ्या. उगीच कसलीही बोटे डोळ्यात घालू नका. डोळा हे आपले नाजूक ज्ञानेंद्रिय आहे. पापणी , बुबुळ , बाहुली , पापणीचे केस ही त्याची उपइंद्रियेही महत्त्वाची कामे करतात. जरा जास्त डोळा चोळलात तर तो लाल होतो. तुम्ही रागावला असाल तरीही ते लालेलाल होतात. तुम्ही शांत असताना तुमचे डोळेही शांत झालेले असतात. डोळ्यांवर तुमचं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका. 

          डॉक्टरांनी सांगितल्याशिवाय डोळ्यांत कोणताही ड्रॉप घालू नका. त्यांचा सल्ला घेऊनच डोळ्यांवर उपचार करा. 

          रात्रीच्या काळोखात तुमच्या डोळ्यांवर प्रखर प्रकाश पडू देऊ नका. सूर्याकडे थेट पाहू नका. प्रखर प्रकाशाकडे पाहिल्यामुळे तुमच्या डोळ्यांतील स्नायूंना इजा पोहोचेल. अर्थात तुमची दिसण्याची क्षमता कमी होत जाईल. म्हणून अधिक काळजी घ्या. 

          पुस्तक वाचन करताना खूप जवळ किंवा खूप लांब धरुन वाचू नका. ठराविक एक ते सव्वा फुटाचं अंतर ठेवूनच वाचन करा. बरंच वाचन झालं , तर थोडा वेळ डोळ्यांची उघडझाप करा. डोळ्यांना व्यायाम द्या. एक दोन मिनिटे डोळे निवांत बंद ठेवा. आणि पुन्हा फ्रेश होऊन वाचन करा. जवळ साधं थंड पाणी असेल , तर ते डोळ्यांना लावा. बरे वाटेल. 

          पूर्वी आमची आई आम्ही घरी आलो की आमच्या डोळ्यांना पाणी लावायची आणि मगच घरात घ्यायची. डोळ्यांचे खूप काम झाले असेल तर त्यांना विश्रांती दिल्याशिवाय गत्यंतर नाही. ज्यांचा आपण आजन्म वापर करणार आहोत , त्यांना जपणं हे आपल्या आणि आपल्याच हातात आहे. चला , माझेही डोळे आता दुखू लागले आहेत , मीही त्यांना थोडी विश्रांती देतो.

©️ प्रवीण अशितोष कुबल ( 9881471684 )






No comments:

Post a Comment

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...