Saturday, June 22, 2024

🛑 एक तास गाण्यांचा

🛑 एक तास गाण्यांचा

          लहान मुलांना जात्याच गाणी खूप आवडत असतात. अंगणवाडीतून पहिलीत प्रवेश केल्यानंतर पहिल्या पंधरा दिवसात शाळेविषयी आपुलकी वाटणं हे गाण्यांमुळे अधिक सोपं होऊ शकतं. 

          शाळा सुरु होऊन आठ दिवस झाले असतील. पुन्हा शनिवारच आला होता. शाळेत जाईपर्यंत पाऊस आलाच नव्हता. शाळेत पोहोचलो तर पाऊस धोधो कोसळू लागला होता. माझ्या मनातही या पावसामुळे विचारांचा धबधबा कोसळू लागला होता. मी शाळेत येता येताच ठरवित असलेली संकल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी प्रयत्न सुरु केले. 

          हल्ली शासनाने शनिवारी ' दप्तराविना शाळा ' घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. शाळेत दप्तर आणलं नसलं तरी शिक्षण घडू शकतं. पुस्तकाबाहेर जाऊन मुलांच्या शब्दसंग्रहात भर घालायची असेल तर मुलांना आवडणाऱ्या गाण्यांचा उपयोग करता आला तर मुलांनाच ते खूप आवडेल. आम्ही आज तेच केलं. 

          परिपाठाला मुले बसत होती. बाहेर पाऊस बरसत होता. मुसळधार पावसाने आपली गाणी आमच्या ओठात आणली होती. धोय धोय पडणारा पाऊस आमच्या मुखातून ' धितांग तांग ' गाणं बरसवून गेलं होतं. मुले मंत्रमुग्ध होऊन गाण्याचा आस्वाद घेत होती. वाकडा तिकडा पडणारा पाऊस शब्दातूनही मुलांच्या डोक्यात घुसू पाहत होता. मुलांनी आता आपला सूर मनापासून सुस्वर करण्याचा प्रयत्न केला होता. सर्व मुले खरंच गाण्यांच्या पावसात न्हावून जाताना दिसत होती. 

          एक गाणे संपले. दुसरे सुरु झाले होते. छोट्या मुलांसाठी ' बडबडगीतांना चांगले दिवस आले आहेत. म्हणून एक सुंदर बडबडगीत घेतले. तेही मुलांनी अगदी स्पष्ट म्हटले. मुलांचा उत्साह ओसंडून वाहताना दिसत होता. म्हणून अजून एक बालगीत म्हणायचे ठरवले. शाळा सुटल्यानंतर घरी गेल्यावर '  दे मला आई खाऊची वाटी ' म्हणणारी मुले या गाण्यावर अधिक रमलेली दिसली. मनात कल्पना अधिक आकार घेत गेली. या एक तासांच्या गाण्यांच्या उपक्रमात सर्व शिक्षकांना सहभागी होण्यासाठी सांगितले. शाळेतील तिन्ही मॅडम लगेच तयारही झाल्या. 

          मी तालासुरात गाणे म्हणणार होतो. माझ्यामागून मुले जसंच्या तसे गाणे म्हणणार होती. गाणे ऐकत असताना मी तिन्ही शिक्षिकांना एक कागद दिला. त्यावर काही लिहिण्यास सांगितले. सीमा वरुणकर यांना गाण्याचा अर्थ समजावून सांगायचा होता. गाण्याबद्दल आपलं मनोगत व्यक्त करायचं होतं. सुजाता कुडतरकर यांना गाण्यातील शब्द लिहून काढायचे होते. लिहिलेल्या शब्दांवर विविध सोपे प्रश्न, मराठी प्रतिशब्द मुलांकडून काढून घेण्याचे काम दिले होते. नवीन नियुक्त पदवीधर शिक्षणसेविका हेमा वंजारी यांच्याकडे गाण्यातील शब्दांना इंग्रजी शब्द मुलांकडून वदवून घेण्यासाठी प्रयत्न करायचे होते. तिन्ही मॅडम या उपक्रमासाठी सज्ज झालेल्या पाहून मला खूप हुरूप आला. 

          ' सुटली गं शाळा, पुसली मी पाटी ' या गाण्यांच्या तिन्ही कडव्यांमध्ये गंमत आहे. मुलांना ही गंमत ऐकवत असताना आपण शब्द चित्र त्यांच्यासमोर उभं करत असतो. आणि आम्ही चौघानी मिळून ते शब्दांचं आभाळ उभं केलं होतं. मुलं पटापट उत्तरं देत होती. मुलांना बोलताना पाहून आम्ही सर्व शिक्षकही थक्क झालो होतो. मुलांना खूप गोष्टी माहिती असतात. फक्त त्या आपल्या उपक्रमातून मुलांच्या डोळ्यासमोर उभ्या करणं हे आपलं काम असतं. प्रत्येकवेळीच ते डिजिटल असायला हवं असं काहीही नसतं. तुम्ही मुलांच्या निरागस डोळ्यात पाहत शिकवलात तर त्यांच्या डोळ्यात जमलेलं भलं मोठं आभाळ तुम्हांला नक्कीच दिसू लागेल. मुलांसाठी दिलेला हा गाण्यांचा एक तास सार्थकी लागल्याचे प्रत्येक शिक्षकांच्या डोळ्यात दिसत होते. प्रत्येक मुलाच्या डोक्यात गाण्यांचा नवीन पाऊस धबधबला होता. 

©️ प्रवीण अशितोष कुबल ( मुख्याध्यापक, शिडवणे नं. 1 )


Saturday, June 15, 2024

🛑 सुट्ट्या संपल्या आता अभ्यास सुरु

🛑 सुट्ट्या संपल्या आता अभ्यास सुरु


          शाळा सलग सुरु असली कि सुट्टी पडावी असे वाटते. पण सलग सुट्टी असली कि कधी एकदा शाळा सुरु होते असे वाटते. सुट्टीपेक्षा शाळेत जाणं कितीतरी पटीने आनंददायक असतं. 

          एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या कि मुले सर्रास शाळेत जाणं बंद करतात. अर्थात शाळेतील अध्यापन बंद झालेलं असलं, तरी संस्कार देणं सुरुच असतं. संस्कार हिच आपल्या आयुष्याची शिदोरी असते. सुसंस्कारीत पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शाळेने स्विकारलेली असते. अर्थात शाळेतील सहा तास संस्कार करताना शाळेला सुद्धा मर्यादा पडतात. 

          शाळा सुरु झाली कि अभ्यास सुरु होतो. अभ्यास सुरु झाला कि वाचन, लेखन आणि संभाषण सुरु होत असते. मुलांनी सर्व कला कौशल्ये अवगत करण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केलेले असते. सध्या तर शाळांमध्ये उपक्रमांचा पूरच आलेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. 

          अर्थात उपक्रम हे मुलांच्या भल्यासाठीच असतात. त्यातून मुलांचं विकसनच लक्षात घेतलेलं असतं. केवळ पुस्तक शिकवलं म्हणजे मुले शिकली असं होत नसतं. केवळ पाठांतर केलं म्हणजेही अभ्यास होत नसतो. आपण जे वाचलं, लिहिलं ते समजलं किती हे अधिक महत्त्वाचे आहे. 

          आजची मुले घरी आल्यावर नुसती लेखनात दंग असतात. बिचाऱ्यांचे कंबरडे मोडत असेल लिखाण करुन. पण दिलेला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे अशा सूचना दिलेल्या असतात. त्या सुचनांचे पालन करताना मुलांचे काही चुकत नसावे. लिहूनही अभ्यास होत असतो. कारण लिहितानासुद्धा आपण पुन्हा एकदा वाचतोच ना? पण नुसते उतारे मारल्याने काहीही साध्य होत नसतं. काही मुले अक्षरशः कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी करताना दिसतात. त्यांना आपण लिहिलेलं ओ की ठो समजत नसतं. असे लेखन निष्फळ ठरत असते. 

          म्हणूनच मुलांनी दररोज वाचन केलं पाहिजे. वाचताना ते समजपूर्वक वाचलं पाहिजे. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. वाचाल तर आयुष्यात नक्की वाचाल. वाचन माणसाला आयुष्यात समुद्ध अनुभव देत असतं. वाचनानंतर लेखन येतं. 

          बघून कोणीही लिहिल. स्वतः विचार करुन लिहिणं जमलं कि लेखन आलंच म्हणून समजा. पण आपल्या सर्वांना नेहमीच आधाराची सवय झालेली आहे. गाईड हा आपला संदर्भग्रंथ झालेला आहे. त्यामुळे आपल्या डोक्याला चालना देण्याचं राहूनच जातं. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेट सर्च करुन शोधण्यात आपण कमालीचे पटाईत झालो आहोत. मग आपल्या बुद्धीला चालना कधी मिळणार ?

          शाळा सुरु झालेल्या दिवसापासून प्रत्येक मुलांनी आणि पालकांनी या गोष्टींचा विचार केलात तर केलेला अभ्यास चिरकाल लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. कारण ती पोपटपंची नसते, तेच खरे स्वतःहून केलेले स्वयंअध्ययन असते. 

          शाळा सुरु झाल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांत प्रत्येक शाळेत शाळा पूर्वतयारी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु होते. मागील वर्षाचे ज्ञान पुन्हा उजळणी स्वरूपात घेण्यात येत असते. किती मुले कोणत्या गोष्टीत मागे आहेत, हे त्यामुळे समजत असते. मुलांनी मराठी पुस्तकाचे वाचन करीत राहावे. हिंदी कविता वाचाव्यात. शिक्षकांनी शिकविण्यापूर्वी पुढे पुढे वाचत गेल्यामुळेही खूप चांगला फरक पडू शकतो. पाढे पाठ करावेत. विसरायला होतात म्हणून पुन्हा पुन्हा म्हणून पाहावेत. गुणाकार आणि भागाकार या प्रक्रिया त्यावरच अवलंबून आहेत. 

          गेले महिनाभर सुट्टीत अनेक मुलांनी पेन हातात घेतलेले नसेल. त्यांना तर आता अचानक लिहिताना जमणार नाही. म्हणून आजपासून दररोज पाच ओळी शुद्धलेखन, अनुलेखन सुरु करायला हरकत नाही. इंग्रजी शब्दसंग्रह वाढावा म्हणून इंग्रजी पुस्तकातील वाचायला येत असलेल्या शब्दांची यादी करावी. अनोळखी शब्दांची वेगळी यादी काढून इंग्रजी शब्दकोशात त्यांचे अर्थ जाणून घ्यावेत. 

          अर्थात अभ्यास करायचा असेल तर दिवसाचा वेळही पुरणार नाही. पण मनापासून करायचाच नसेल तर शिक्षकांनी दिलेला अभ्यास फक्त वहिपुरता मर्यादित राहील, डोक्यात कधीच जाणार नाही हे शंभर टक्के खरे असल्याची प्रचिती आली आहे. म्हणून आजपासून अभ्यासाला लागा. 


©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. 1

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...