Tuesday, September 3, 2024

🛑 आधी गणाला मनी साठवावा

🛑 आधी गणाला मनी साठवावा


          गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले कि सगळ्यांचीच लगबग सुरु होते. मुलांना सुट्टी पडणार म्हणून मुले खुशीत असतात. आकारिक चाचणी पहिली पार पडलेली असते. शाळेत विविध उपक्रम सुरुच असतात. विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची रस्सीखेच सुरु झालेली असते. 

          मुले घरातील सजावटीत रमलेली असतात. भिंतीना रंग, सफाई, मखर बनवणे, गणेशमूर्ती बघायला जाणे अशी कामे मुलांची आवडीची. अभ्यासापेक्षा मुले यात जास्त रमतात. त्यात त्यांना आपल्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागलेली असते. कधी एकदा तो दिवस येतो असे त्यांना झालेले असते. तबला, डग्गा, सुरपेटी, ढोलकी, मृदूंग आणि चकी ( झांज )  यांना बाहेर काढण्यात येते. खूप दिवसानंतर आपल्यावर थाप बसणार म्हणून वादयेही खुशीत वाजू लागतात. 

          घरातलं वातावरण पूर्ण उत्साहाच्या धबधब्यांनी  न्हाऊन निघतं. मुंबईची मंडळी नेहमीच दोन दिवस अगोदर येतात. त्यांची ' मुंबईची बोली ' घरोघर घुमू लागते. मराठी आणि गावाकडच्या मिश्र भाषेने गप्पा रंगून जातात. चाकरमानी आल्यामुळे गावाकडले म्हातारेशितारे पुन्हा तरुण बनून कामात हातभार लावू लागतात. 

          पताका कापून त्या लावण्यातील मज्जा काही औरच असते. सर्व भिंतीवर कॅलेंडरे झळकू लागतात. गणपतीची खोली हा हा म्हणता सजून जाते. बाप्पासाठी आरास करताना अजिबात कंटाळा येत नाही. अंगातील आजारपण कुठल्या कुठे निघून जाते.

          छतांवर रंगीबेरंगी पडदे झुलू लागतात. बघावं तिकडे पाहत राहावं असं वातावरण असतं. एवढं प्रसन्न चित्त होण्यासाठी फक्त एकमेव ' गणपती बाप्पा ' कारणीभूत असतो. 

          हौशी भजन मंडळे तयारीला लागतात. त्यांची रंगीत तालीम सुरु झालेलीच असते. एकापेक्षा एक उडत्या चालीवर गाणी बसविण्याची जणू स्पर्धाच सुरु होणार असते. गणपतीवर कित्येक गाणी रचली जाण्याचा काळ असतो हा. सारेजण गणपतीमय होऊन जातात. जीवनातील अनेक प्रसंगांना तोंड देताना त्यावर मात करायला शिकवणारा प्रत्येकाचा ' माझा बाप्पा ' तनमनात येत राहत असतो. 

          चतुर्थीचा दिवस उजाडतो आणि आनंदाला उधाण येते. आपल्या बाप्पाचं आगमन प्रतिवर्षी हवंहवंस वाटणारं असंच असतं. घरातील मुलेमाणसे गणपतीसाठी एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना पाहून थोरामोठ्यांची छाती फुलून येते. आरत्या, भजने आणि खाद्यपदार्थांची रेलचेल सुखावून जाते. माणसे तनाने आणि मनाने सुद्धा अधिकाधिक जवळ येऊ लागतात. 

          गणपतीसाठी आतून आतुर झालेली माणसे पाहून हा गणेशोत्सव कधी संपूच नये असं वाटत राहत असतानाच त्याच्या विसर्जनाच्या वेळी डोळ्यातून पाणी तरळते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, " आधी गणाला मनी साठवावा " 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १











Thursday, July 25, 2024

🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव

🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव 


         सध्याचे जीवन अतिशय धकाधकीचे, स्पर्धेचे आणि अतीतणावाचे झाले आहे. तणावाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्याशिवाय दिवस संपतही नाही. या तणावांचा सामना मोठ्यांनाच नव्हे तर लहानांना देखील करावा लागत आहे. सुट्ट्या पडल्या तरी हा तणाव त्यांची पाठ सोडत नाही. काहीवेळा थोडा तणाव हा जीवनावश्यक असतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वजण तंत्रस्नेही बनत चालले आहेत. जेवढे तंत्रस्नेही बनतील तेवढे त्यांचे तणाव वाढतील. तंत्रस्नेही बनणे जरुरीचे असले तरी त्यामुळे माणसांची जीवनशैली बदलत चालली आहे. 

कित्येक तास मोबाईलवर , लॅपटॉपवर किंवा टॅबवर अभ्यास करणारी मुले पाहिली कि त्यांची खरंच चिंता वाटू लागली आहे. विविध आभासी गेम्स खेळणारी मुले पाहूनही त्यांच्या भावी जीवनाचे काय होईल याची कल्पनाच करवत नाही. एकूणच काय आपल्या दैनंदिन जीवनाचे ‘ मिशन लाईफ ’ भरकटत चालले आहे. ही भरकटणारी जीवन नौका व्यवस्थित पैलतीरावर आणावयाची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला पर्यावरणाविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे झाले आहे. 

म्हणूनच की काय शासनाने ‘ उन्हाळी शिबीर ’ ही संकल्पना आणलेली असू शकते. मुलांना सुट्टी असताना ५ जून ते ११ जून असे सात दिवस सात थीम्स घेऊन ही संकल्पना उपक्रमस्वरुपात राबवणे असा शासन आदेश आहे. हे शिबीर राबविण्यात अनेकांना अडचणी आलेल्या असू शकतात. पण शाळा सुरु झाल्यानंतर सुद्धा आपण या परिपत्रकाचा आधार घेऊन यावर्षी शालेय दिवसांमध्ये किंवा पुढील मोठ्या सुट्ट्यांमध्ये असे पर्यावरणप्रेमी उपक्रम राबविल्यास मुलांना ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यास नक्कीची मदत होऊ शकते असे वाटते. 

सुट्ट्या पडल्या की मुलांचे काय करायचे हा यक्ष प्रश्न प्रत्येक पालकांना पडत असतो. मी शिक्षक असलो तरी मी पालक म्हणून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मलाही तसेच वाटते. ग्रामीण भागातील मुले सुट्टीच्या काळात शहरात जातात. शहरी भागातील मुले आपल्या गावाकडे सुट्टीचा आनंद घ्यायला जातात. कदाचित हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारे उन्हाळी शिबीरच आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. पण त्यात नियोजनबद्धता नसते. त्यात विविध मर्यादा पडतात. सुसंस्कार होतील याची गॅरंटीही नसते. त्यामुळे जे पालक आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करू शकतात , ते पालक आपल्या मुलांना अशा खाजगीत होणाऱ्या उन्हाळी शिबिरांना पाठवतात. तिथे मुलांना स्वतःची कामे स्वतःच करावी लागतात. मुलांचा पूर्ण दिवस वेळापत्रकाप्रमाणे आखलेला असतो. कधी काय उपक्रम करायचा हे लेखी स्वरूपात लिहिलेले असते. खाणे , पिणे , हुंदडणे आणि बरेच काही घड्याळाच्या काट्यावर चाललेले असते. सर्वसामान्य मुलांच्या पदरात या गोष्टी पडतच नाहीत. त्यांना घरची कामे करावी लागतात. सुट्ट्या त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी पोषकच असतील हे सांगता येत नाही. तरीही ही मुले सुट्टीचा आनंद घेतातच. आपल्या जवळच्या आजोळी जाऊन मामाच्या घरी आनंद घेणारी मुले मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मी स्वतःही अशा अनियोजनबद्ध शिबिराचा आनंद घेऊन मोठा झालो आहे. पण पालक झाल्यानंतर माझी मुले नियोजनबद्ध उन्हाळी शिबिराचा भाग बनावीत असे मला कित्येकदा वाटले आहे. पण मी काही माझ्या मुलांना शिबिरांचा लाभ देऊ शकलेलो नाही. 

आजच्या शिक्षकांना दररोज विविध उपक्रम राबविण्याचा तणाव नक्की येत असेल. तरीही आपल्याला जमेल तसे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करताना दिसत आहेत. उपक्रम राबवले म्हणजे आपण यशस्वी होत नसतो. त्यांची फलनिष्पत्ती दिसली कि आपल्याला लाखमोलाचे समाधान वाटत असते. आजची मुले जीवनात पुढे यशस्वीपणे झुंज देण्यासाठी सक्षम बनविण्याची बिजे या उपक्रमांत असतात. आपल्या मुलांची ही पिढी भावी आयुष्यात सकारात्मकतेने , सुदृढतेने जीवन जगताना दिसतील तेव्हाच आपल्या उपक्रमांना यश मिळाल्याचे लक्षात येईल. 

त्यासाठी मुलांनी निसर्गावर प्रेम करायला शिकायला हवे. निसर्गफेरी आयोजित करून आपण त्यावर काही प्रमाणात मात करू शकतो. परिसरात झाडे लावून त्यांचे जतन करताना मुलांचे वृक्षप्रेम जागृत होईल. आपल्या जवळपास पर्यावरणप्रेमी क्षेत्रभेटी आयोजन करत असताना मुले भावी उद्योजक बनू शकतात. ही पहिल्या दिवसाची थीम आहे. 

शाळेत पोषण आहार सुरु आहे. त्यात शाळेत पिकविलेल्या भाज्या शिजवून देताना त्यांच्यात श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल. परसबागेचे उपक्रम त्यासाठीच तर आहेत. जेवल्यानंतर उरणारे अन्न किंवा कचरापेटीत टाकावयाचे अन्न म्हणजे ओला कचरा आहे. त्याचेही व्यवस्थापन त्यानिमित्ताने मुलांना समजावे हा हेतू आहे. मुलांनी हा ओला कचरा स्वतः शोषखड्ड्यात टाकावा , त्याचे बनलेले कंपोस्ट खत आपल्या परसबागेत वापरता येते. ही जी जीवनशैली आहे ती खरी आरोग्यशैली आहे याची ओळख या अशा इको क्लबमधून दिल्यास अधिक उत्तम होईल.ही दुसऱ्या दिवसाची थीम आहे. 

सध्या शाळेमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यांच्या सततच्या वापराने ती खराब होत असतात. त्यामुळे तो सुद्धा एक कचराच होतो. त्याचा कसा निचरा करावा हेसुद्धा मुलांना या तिसऱ्या दिवसाच्या थीममधून सांगणे अपेक्षित आहे. त्यासाठी अशा कचऱ्याचा विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांशी संपर्क करणे ही पुढील काळाची गरज असणार आहे हेही मुलांना समजाविता आले तर त्याचाही मुलांना पुढील जीवनात फायदाच होणार आहे. 

शालेय जीवनात परिपाठापासून सफाई कामाला सुरुवात होते. मोठ्या शाळेमध्ये परिसर मोठा असतो , त्यामुळे सुका कचरा जास्त असतो. पोषण आहार योजनेत ओला कचरा निर्माण होतो. दोन्ही कचऱ्याचे व्यवस्थापन मुलांना शिकविले गेले पाहिजे. त्याचा उपयोग ही मुले आपल्या घरी देखील करतील. कचरा व्यवस्थापन केल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू असतात. या टाकाऊ वस्तू सुद्धा काहीवेळेला टिकाऊ करण्याची क्षमता मुलांमध्ये आणली जाऊ शकते. मुले कल्पक असतात , त्यांना हे काम दिले कि मुलांच्या विचारचक्राला चालना मिळते. मुले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून विधायक कार्य करण्यास प्रेरित होतात. पुढील आयुष्यात त्यांना अशा अनेक संकटांना तोंड देताना या कौशल्याचा उपयोग हमखास होणार आहे. ही चौथ्या दिवसाची थीम आहे. 

पाचव्या दिवशी मुलांची ‘ ऊर्जा समिती ’ स्थापन करावयाची आहे. अक्षय ऊर्जा या विषयावर मुलांना एखादे प्रबोधनपर व्याख्यान देता आले तर नक्की आयोजन करावयाचे आहे. सौर ऊर्जेचा वापर करुन आपली कामे मार्गी लावता येतात हेही त्यांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. शाळेमध्ये सौर ऊर्जा पॅनल देखील असू शकतात. त्यांचा वापर करुन आपण एक प्रकारे ऊर्जेची बचतच करत आहोत हेही मुलांना समजू शकेल. ऊर्जा संवर्धनाकरिता मुलांची पोस्टर स्पर्धा देखील आपण आयोजित करू शकतो. 

शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. पाणी हे जीवन आहे. ते कमी असताना किंवा टंचाई असताना आपण ते जपून वापरतो. परंतु ते मुबलक प्रमाणात असले तरीही ते जपूनच वापरले पाहिजे ह्या सवयी मुलांच्या अंगी रुजविणे यातून शक्य होऊ शकते. शुद्ध , अशुद्ध पाणी आणि जलसंधारण विषयक मार्गदर्शने आयोजित करता येऊ शकतात. ही सहाव्या दिवसाची थीम आहे. 

शाळांमध्ये हल्ली प्लास्टिक पिक अप डे साजरे केले जातात. प्लास्टिक कचरा ही पर्यावरणाची फार मोठी समस्या आहे. मुलांनी प्लॅस्टिकच्या वस्तू न वापरता किंवा त्यापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता भावी जीवनात जागृत व्हावे हा यामागील हेतू आहे. मुलांनी जाणीवपूर्वक प्लास्टिकरहित वस्तूंचा कायम वापर करावा अशा सवयी लावता आल्या तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शाळेत पोस्टर मेकिंग स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , घोषवाक्ये स्पर्धा इत्यादी घेता येऊ शकतात. 

ही या उन्हाळी शिबिरातील सातव्या दिवसाची थीम आहे. 

अर्थात असे सप्ताह किंवा शिबिरे आयोजित करुन मुलांच्या , पालकांच्या आणि समाजाच्या मनात विविध समस्यांची जाणीव निर्माण करुन देणे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे काम आहे. हे काम निरंतर करणे ही खरी गरज आहे. पण याद्वारे जागृत झालेली मुलांची मने पुढे अधिक समृद्ध आरोग्यदायी पिढी घडवतील अशी आशा बाळगूया. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ 


मार्गदर्शक : शिक्षण परिषद , २५ जुलै २०२४ : केंद्र शेर्पे व खारेपाटण 



 

Saturday, July 13, 2024

🛑 एक स्वानंदी शनिवार

🛑 एक स्वानंदी शनिवार

          शाळांमध्ये सध्या दर शनिवारी ' आनंददायी शनिवार ' नावाचा उपक्रम अतिशय उत्साहात साजरा केला जात आहे. दप्तराविना शाळा आणि आनंददायी शनिवार निमित्त शाळेतील मुलांना विविध शैक्षणिक, सामाजिक, मानसिक, आरोग्यदायी, कृतियुक्त आणि तणावरहित वातावरणात अनुभव देण्याचा शासनाचा उपक्रम खरंच स्तुत्य म्हणायला हवा. 

          आमच्या शाळेत या उपक्रमांची सुरुवात झाल्याचे माझ्या छोट्या मुलीला कळले. तिला मी सहजच बोलून गेलो, " उर्मी, मी तुला कधीतरी माझ्या शाळेत घेऊन जाणार आहे. तू छान हावभाव करुन गोष्टी सांगतेस. आमच्या शाळेतील मुलांना तू सांगितलेल्या गोष्टी आवडतील. " मी सांगितल्यावर ती तर माझ्या खनपटीलाच बसली. नुसता शाळेत येणार म्हणून घोषाच लावला. मग काय ? येत्या शनिवारी मी तुला शाळेत नेईन असे प्रायोगिक तत्वावर सांगून टाकले. मला वाटले ही मुलगी विसरून जाईल. पण तिने तयारी करायला सुरुवातही केली होती. एका संध्याकाळी तर  ती आरश्यासमोर राहून एकटीच कथा सांगण्याचा सराव करताना मला दिसली. 

          आज तो दिवस उजाडला. बाहेर पाऊस तुफान बरसत होता. एवढ्या पावसातून तिला तीस किलोमीटर वरील शिडवणे नं. १ शाळेत नेणे मला तर जीवावरच आले होते. पण ती आपल्या स्वतःच्या शाळेतील वर्गशिक्षिकांची परवानगीसुद्धा घेऊन आली होती. ती गाढ झोपली होती. तिला थोडेसे हलवून जागे केले. ती लगेच उठून बसली. तयारीला लागली. अर्ध्या ते पाऊण तासात तिची तयारी झालीसुद्धा. 

          पाऊस थांबायचे नाव घेत नव्हता. आम्ही बापलेक रेनकोट घालून पावसाशी सामना करत शाळेकडे निघालो. ती माझ्या बाईकवर मागे घट्ट मिठी मारुन बसली होती. ती नीट बसली असली तरी मलाच तिच्या सुरक्षेविषयी भीती वाटू लागली होती. पुन्हा बाबा आणि पत्नी दोघांनीही मला तिच्या सुरक्षेविषयी पुन्हा पुन्हा बजावून सांगितले होतेच. थोडे पुढे गेल्यावर मी तिला माझ्या पुढेच बसायला सांगितले. ती बसली. तिला तशी बसायची चांगलीच सवय आहे. 

          पण पावसाचे मोठे थेंब तिच्या तोंडावर बसत होते. गाडीचा वेग वाढे, तसे पाऊस मोठ्यांदा कानपटीत मारल्यासारखा करत असे. पण ती कथा सांगण्याच्या उत्साहात होती. त्यामुळे तिला होणारा त्रास तिने मला अजिबात जाणवू दिला नाही. जवळ जवळ एक तासाचा प्रवास तिला छोटीला भर पावसात त्रासदायक होता हे कोणीही मान्य करेल. 

          ती जात्याच स्टोरीटेलर आहे. तिच्या दोन्ही मोठ्या बहिणी सेम तश्याच आहेत. त्यांच्याकडून तिला हा वारसा मिळाला असावा. तिन्ही मुली एकत्र असल्यावर त्यांच्या गप्पागोष्टींना कधीही अंत नसतो. मी ओरडल्याशिवाय त्यांचं बोलणं थांबत नसतं. लहानपणापासून मी त्यांच्याशी प्रमाणभाषेत बोलत आलोय. त्यांना ओरडतानासुद्धा मी प्रमाणभाषा सोडत नाही. गावी गेली की ह्या मुली ' मालवणी भाषा ' सुद्धा शुद्ध बोलतात. म्हणजे अस्सल बोलतात असे मला म्हणायचे आहे. 

          तिचे कपडे भिजले म्हणून शाळेत गेल्यागेल्या शाळेतील बाईंनी तिला कपडे बदलायला मदत केली. तिला नीट पुसून काढले. पाच मिनिटांत मी फलकलेखन केले. ' गोष्टींचा शनिवार : आनंददायी शनिवार ' उपक्रम सुरु केला. माझी मुलगी कुडकुडत होती. पण कथाकथन करण्याचा जोश कायम होता. 

          तिने आपल्या कथाकथनाला तिच्या शैलीत सुरुवात केली. तिचे दात थंडीने एकमेकांवर आपटत होते. पण तिने जिद्द सोडली नाही. एकापाठोपाठ एक करत तिने सलग पाच कथांचे हावभावयुक्त सादरीकरण केले. मुलांचे आणि शिक्षकांचेही लक्ष अजिबात ढळू दिले नाही. ते तिचे स्टोरी टेलिंगचे कौशल्यच म्हणायला हवे. 

          गोष्टींचा तास संपल्यावर सर्व मुलांच्या गगनभेदी टाळ्यांनी ती पुरती भारावून गेलेली दिसली. मीही बोलता बोलता तिच्या काही गोष्टी सांगताना हळवा भावनाविवश झालो असताना तिच्याही डोळ्यात पाणी तरळले होते. स्वानंदीने खऱ्या अर्थाने सर्वांचा शनिवार निखळ आनंदी बनवला होता. ती स्वतः देखील शाळेतून घरी येताना मला म्हणाली, " पप्पा, मी आज खूप खूप आनंदात आहे. इतका आनंद मला कधीच झाला नव्हता. " 

          मी गाडी चालवत होतो. ती पुढे बसली होती. माझ्या डोळ्यात आलेले पाणी अजिबात थांबू पाहत नव्हतं. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Friday, July 12, 2024

🛑 लाडक्या बहिणी शाळेत येतात तेव्हा.....

🛑 लाडक्या बहिणी शाळेत येतात तेव्हा.....

          मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून गावाकडे शिकलेल्या माहेरवाशिणी आमच्या शाळेकडे येऊ लागल्या आहेत. शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी शाळेत रोजच या बहिणी किंवा त्यांचे भाऊ, वडील, आई अशी मंडळी येतात तेव्हा खूप आनंद होतो. आनंद याच्यासाठी कि कधीतरी पासष्ट वर्षांपूर्वी शिकायला शाळेकडे आलेल्या आजीबाईसुद्धा आपला दाखला मागायला येत आहेत म्हणून. 

          त्यांच्या वेळचे ते शिक्षक त्यांना आठवत असतील का ? एवढे बोलायलाही तसा वेळ नसतोच, पण आमच्या शाळेला त्यांचे पाय लागत आहेत हे आमचे भाग्यच. आम्हांला काय फक्त एक आणि एकच दाखल्याचा कागद त्यांच्या हाती सोपवायचा असतो. तो सोपवताना आम्ही जी सेवा देतो आहोत, ते पाहून त्यांच्या डोळयांतील कृतज्ञतेचे भाव बघताना जणू आपले नातेवाईक भेटल्याचा भास होतो आहे. या योजनेमुळे शाळेकडे येणारी माणसे दररोज कमीत कमी चार तरी येतच आहेत. 

          आता आमचे काम वाढले आहे हे नक्की. तरीही ते करताना कोणताही थकवा येत नाही हे विशेष. पूर्वी कुणी दाखला मागायला आले कि तो बनविण्यासाठी मोठे कष्ट पडत नसत. मोठ्या शाळेत खूप जुने रेकॉर्ड असते. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म झालेल्या आजोबा आजींचे दाखले नेण्यासाठी लोक आठवड्याला दोन तरी येतच असतात. या गोष्टीची आम्हाला सवयच झाली आहे म्हणा ना !!!

          शाळा सोडल्याचा दाखला बनवणे तशी वेळकाढू गोष्ट असते. मागणी घ्या, प्रतिज्ञापत्र बनवा, सात ते आठ रजिस्टरांमध्ये नाव शोधा असे काम असते. एकदा नाव सापडले कि दाखला बनवायला दहा ते पंधरा मिनिटे पुरेशी होऊ शकतात. पण अभ्यागतांकडून जन्मतारीख नीट समजू शकली नाही तर अंदाजाने वय आणि जन्म यांचा मेळ घालत जीर्ण झालेल्या जुन्या जनरल रजिस्टरांमध्ये डोके खुपसताना नाव सापडले कि कोण आनंद होतो म्हणून सांगू ? जो दाखला मागायला आलेला असतो त्याचा चेहरा त्यावेळी बघायला हवा. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिला आहे. 

          काही सरकारी कार्यालयात एखादा मागणी केलेला कागद मिळण्याचा कालावधी लिहून ठेवलेला असतो. त्यामुळे तिथे तितके दिवस कागद मिळण्यासाठीचा संयम पाळावाच लागतो. मात्र शाळेत असे दाखले लवकर दिले जातात असा माझा अनुभव आहे. तिथे दिवसांचा कालावधी दिलेला आहे का अभ्यासावे लागेल. 

          आलेली माणसे आपल्या ओळखीची असोत किंवा नसोत, दाखले तयार करुन देणे आपले कर्तव्यच असते. ही मंडळी आली की त्यांना थांबायला सांगून अध्यापनाची कामे करणे जीवावर येत असते. कधीतरी हातातले सुरु असलेले काम हातावेगळे करेपर्यंत थांबा अशी नम्र विनंती केली तर लोकं नक्की थांबतात. एक काय दोन दोन तास सुद्धा थांबून दाखला नेणाऱ्या मंडळींची चिकाटी उल्लेखनीयच म्हणायला हवी. अर्थात कधीतरी दाखला द्यायचाच असतो, तर तो आजच दिला तर ? तर आलेली व्यक्ती आनंदी होऊन जाताना दुवा देऊनही जात असावी. 

          आज मी आणि माझ्या शाळेतील तिन्ही शिक्षिकांनी शालेय अध्यापन , पायाभूत चाचणी, केंद्रप्रमुख भेट, पोषण आहार, फुलझाडे लागवड, उद्या होणाऱ्या बांधावरच्या शाळा उपक्रमाची पूर्वतयारी आणि आलेल्या नऊ लाडक्या बहिणींचे दाखले देऊन कामांचा सिक्सरच मारला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

          या सर्व लाडक्या बहिणींना या नव्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अजून उदंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल तेव्हा त्या आनंदाची बेरीज होईल. आमच्या शाळेकडे येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थिनी, माहेरवाशिणी आणि लाडक्या बहिणींचे नेहमीच सहर्ष स्वागत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



Thursday, July 11, 2024

🛑 मुलं घरी अभ्यासच करत नाहीत

 🛑 मुलं घरी अभ्यासच करत नाहीत

          शीर्षक वाचून तुम्ही सुद्धा असंच म्हणाल अशी शक्यता अजिबात नाकारता येत नाही. कारण गेली कित्येक वर्षे मी हे ऐकत आलो आहे. अर्थात काही मुले याला अपवाद असतीलच. प्रत्येक गोष्टीला अपवाद हे असतातच. 

          पण हा प्रश्न जसा पालकांना पडतो, त्यापेक्षा जास्त तो माझ्यासारख्या शिक्षकांना जास्त पडतो. आम्हांला जसा अभ्यास हवा असतो, तसा झपाटून अभ्यास करणारी मुलेच आता दुर्मिळ होत चालली आहेत. 

          दरदिवशी शिक्षक घरचा अभ्यास देत असतात. हा घरचा अभ्यास मुलांनी करावा असं अपेक्षिलेलं असतं. दिलेल्या अभ्यासापैकी सर्वच अभ्यास महत्वाचा असतो. पण मुले त्यापैकी आपल्याला जमणारा थोडासा अभ्यास करुन दुसऱ्या दिवशी ' विसरलो, लाईट नव्हता, पेन संपले, बरे नव्हते, आणि अशी अनेक कारणे सांगून प्रत्येक दिवस घालवायचे बघत असतात. त्यांना आजचा दिवस गेल्यासारखे वाटते, पण एक अभ्यासयुक्त दिवस त्यांच्या आयुष्यातून कायमस्वरूपी निघून गेलेला असतो. 

          शिक्षकांना अभ्यासक्रम, उपक्रम आणि दैनंदिन कामे सतत येतच असतात. ती करता करता अभ्यास शिकवायचा असतो. शाळेच्या तासांपैकी सर्वच विषयांचे नेहमीच अध्यापन होणे शक्यही नसते. केवळ वाचन आणि घोकंपट्टी म्हणजे अभ्यास नसतो. केलेल्या अभ्यासाचा उपयोग मुलाने पुढील आयुष्याच्या उभारणीसाठी चिरकाल करावयाचा असतो असे अपेक्षिलेले असते. 

          आज मुले घरी गेल्यावर काय करत असतील ? दप्तर जागेवर नीट ठेवतात का ? दिलेला अभ्यास एका जागेवर बसून सुंदर अक्षरात लिहितात का ? कि मोबाईल घेऊन त्यावरच अभ्यास करत बसतात ? गेम खेळत बसतात?  यु ट्युब बघत बसतात ? पालकांनी मोबाईल दिलाच नाही तर..... तर मग त्यांचा मोर्चा टीव्ही कडे वळत असेल का ? कार्टून्स आणि त्यांना आवडणारे किड्स चॅनल रिमोटवर भराभर बदलत असतील का ? नाहीतर घरात दप्तर फेकले कि शाळेचे कपडे न बदलता शेजारी पाजारी खेळायला जाणारी मुलेही असतीलच. हे सगळं न करता प्रामाणिकपणे अभ्यास करणारी मुले पाहिली तर आजच्या पालकांनाच आश्चर्याचा सुखद धक्का बसू शकतो. 

          घरी गेल्यावर जी मुले स्वतःहून अभ्यासाला बसतील ती मुले खरंच कौतुकास पात्र आहेत. पण आजच्या मुलांना सतत कानीकपाळी ओरडावे लागते. अभ्यास करा रे...... अभ्यास करा रे...... असा नुसता पिच्छा पुरवावा लागतो. तेव्हा कुठे मुले कशीतरी मारुन मुटकुन अभ्यासाला बसली तर त्यांना आपण पालकांवर आणि शिक्षकांवर फार मोठे उपकार करत आहोत असे वाटत असेल. 

          शिक्षक नेहमीच अभ्यास देत असतात. रोजचा अभ्यास त्या त्या दिवशी पूर्ण करण्याबाबत पुन्हापुन्हा सांगत असतात तर त्यांच्या पदरी नेहमीच अपेक्षाभंग येत राहतो. स्वतः कमी नसताना ज्यावेळी मुले कमी पडताना दिसतात, त्यावेळी जे दुःख होते ते नेहमी सलत राहणारे असते. सतत सांगून जर मुले पालकांचे ऐकत नसतील तर अशी मुले शिक्षकांचे का ऐकतील ? किंवा कशी ऐकतील असा मलाही प्रश्न पडतो. 

          संध्याकाळी मुले अभ्यासाला बसण्यासाठी जी जागा निवडतात, तिथे भला मोठा टीव्ही त्यांचा अडसर बनलेला असतो. घरातील मोठी माणसे दिवसभर कामाने दमून विश्रांती घेत असतात. टीव्ही सिरीयल बघणे ही त्यांची दिवसभराची विश्रांतीच असते. त्यांना मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष द्यायला वेळ नसतो. असलाच तर टीव्हीवर एखादी मालिका त्यांना मुलांपासून दुरावत राहते. मग मुलेसुद्धा त्यात सामील होतात. पालकांबरोबर मुलांचेही मनोरंजन होत राहते. एक सिरीयल संपते, दुसरी सुरु होते. तिसरी, चौथी करत रात्रीचे नऊ, दहा, अकरा वाजतात. आता जेवत जेवत टीव्ही बघणे सुरु राहते. मुलांचा आजचा अभ्यास दुसऱ्या दिवसावर जात राहतो. 

          मुले सकाळी लवकर उठण्याची शक्यता नसतेच. उशिरा उठलेली मुले मग शाळेत जायची तयारी करु लागतात. अपूर्ण अभ्यास झालेली मुले पुन्हा एकदा शाळेत येतात. पुन्हा संध्याकाळी शाळा सुटते. पुन्हा तसेच चक्र सुरु राहते. खरा अभ्यास करायचा राहूनच जातो. शिक्षक आणि पालक यांचे प्रश्न अनुत्तरीतच राहतात. यावर काय करायचे ? ज्यांना प्रश्न पडला असेल त्यांनीच उत्तरे शोधायची असे सांगण्यात येते. गृहकार्य एक आव्हान???

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Monday, July 1, 2024

🛑 सुंदर मी होणार

🛑 सुंदर मी होणार

          सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतात. सुंदर दिसणं आणि सुंदर असणं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शाळेत येणारी सर्वच मुलं सुंदर असतात. ती शरीराने आणि मनाने दोन्ही प्रकारे सुंदर असतात. त्यांच्या मनाचा ठाव घेता आला तर ? किती सुंदर विचारांचं मधाळ पोळं आपल्या सोबत सतत असतं हे माझ्यासारख्या शिक्षकांचं भाग्यच. 

          मनात सुंदर भावना घेऊन आलेली ही निष्पाप मुले सतत आमच्या सहवासात असतात. आमच्या जीवनाचं जणू सोनंच होऊन जातं. नोकरीत असताना आम्ही हे दुर्मिळ भाग्य नित्यनियमाने अनुभवत असतो. शाळेत येणारी मुले रोज नव्या दमाने शिकण्यासाठी आतुरतेने आपल्याकडून अपेक्षा ठेवत असतात. आपण त्यांच्या अपेक्षांना किती पात्र ठरतो देव जाणे ? आपलं आणि त्यांचं एकदा जमलं की ती आपल्यावर पालकांपेक्षा जास्त विश्वास ठेऊ लागतात. त्यांच्या विश्वासाला आपण अजिबात तडा पडू देता कामा नये हे सतत आपल्या लक्षात असायला हवं. कारण आपण शिक्षकच त्यांचे पहिले वहिले आदर्श असतो. म्हणून पहिलीची मुलगी तिला ' तू कोण होणार ? '  म्हणून विचारताच झटक्यात सांगून टाकते, ' मी पहिलीच्या बाई होणार !!! ' तिचं हे उत्तर आपल्याला सर्वांनाच विचार करायला लावणारं आहे. ती शाळेत आल्यापासून पहिलीच्या बाईंकडेच पाहत असते. बाई जशा बोलतात, तशीच ती बोलण्याचा प्रयत्न करत असते. बाई वर्गात कशा शिकवतात, कशा ओरडतात, कधी मारतात याकडे तिचं बारकाईने असलेले लक्ष गांभीर्याने घेतले पाहिजे. अर्थात ही गोष्ट घरच्यांना सुद्धा लागू पडते. 

          कारण लहान मुलांचं हे बालमन टिपकागदासारखं सगळ्या गोष्टी टिपण्याचं काम करत असतं. मोठ्या माणसांनी, शिक्षकांनी केलेल्या सगळ्याच गोष्टी बरोबरच असतात यावर त्यांचा दृढविश्वास असतो. आईने किंवा बाबांनी सोडवून दाखवलेले उदाहरण बरोबर असलं तरी जोपर्यंत बाई त्याला बरोबर म्हणत नाहीत, तोपर्यंत मुलाचा अजिबात विश्वास बसत नाही. याचा अर्थ असा होतो कि आपल्या शाळेत आलेलं प्रत्येक मूल आपल्या सर्व हालचाली लक्षपूर्वक पाहत असतं याकडे आपलं लक्ष असायला हवं. आपण करत असलेल्या अनावश्यक हालचालीसुद्धा मुलांच्या नजरेतून सुटत नसाव्यात. 

          शाळा सुटण्याची वेळ झाली होती. मी सकाळच्या परिपाठाला उपस्थित नसल्याचे एका मुलीच्या दिवसभर लक्षात असेल हे माझ्या लक्षात नव्हतेच. मी शाळेच्या काही कामानिमित्त थोडा उशिरा आल्याने आजचा परिपाठ मला चुकला होता. आज यामिनीचा वाढदिवस होता. यामिनी नुकतीच पहिलीच्या वर्गात दाखल झाली होती. गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तिची आणि माझी पुसटशी ओळख झाली होती. शाळा पूर्वतयारी मेळाव्यांच्या दोन टप्प्यांमुळे ती मला चांगलीच ओळखू लागली होती. मी तिचा वर्गशिक्षक नव्हतोच. 

          शाळा सुटता सुटता कुणीतरी दाखल्यासाठी आले होते. मी दाखला बनवून देण्याच्या गडबडीत. माझं लक्ष दाखल्यात काही चुकू नये याकडे लागलं होतं. दाखला लिहून पूर्ण झाला होता. कुणीतरी मला मागे हात लावीत असल्याचं जाणवलं. ती यामिनीच होती. तिचा आज वाढदिवस होता.  तिने आपल्या चिमुकल्या हातांनी दोन चॉकलेट्स माझ्याकडे धरली होती. मी आश्चर्यचकित झालो होतो. माझा दाखला लिहून पूर्ण होईपर्यंत ती माझी वाट बघत थांबली होती. आता मी मोकळा झालो आहे असे वाटल्यानंतरच तिने हसतमुखाने हात पुढे केला होता. पहिलीत नव्याने हजर झालेल्या मुलीने मला देण्यासाठी दोन चॉकलेट्स शाळा सुटेपर्यंत खाल्ली नव्हती हे विशेष नमूद करायला हवे. त्यावेळी मला ती मुलगी अतिशय सुंदर दिसली. तिचं ते निरागस सौंदर्य कोणालाही लाजवणारं असंच होतं. ही मुलगी पुढे नक्कीच आदर्शवत होणार यात मला आजतरी शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १


🛑 एक तास पानांचा

🛑 एक तास पानांचा

      विज्ञान शिकविताना शाळेत विविध प्रात्यक्षिके घेतली जातात. मुले सतत निरीक्षण करीत असतात. त्यांची निरीक्षण शक्ती आपल्यापेक्षा खूपच जलद असते. 

        विज्ञान आणि परिसराभ्यास या विषयांना पूरक असा अभ्यास विषयक उपक्रम घेण्याचे मनात होते. सर्व विद्यार्थ्यांना त्यात सामील करुन घेता आले तर ? हा प्रश्न सतावत होताच. शिक्षकाच्या मनात प्रश्न आला कि त्याचं आव्हानात रूपांतर होतं असतं. कोणतेही आव्हान हसतमुखाने स्वीकारणारे अनेक शिक्षक खऱ्या अर्थाने अध्ययनासाठी मुलांना तयार करीत असतात. 

       परिसरातील झाडांचं निरीक्षण करणारी मुले त्यांच्या पानांना ओळखत असतात. तरीही परिसरात उपलब्ध नसणारी झाडे नेहमीच मुलांसाठी अनोळखी राहून जातात. सर्व मुलांना जास्तीत जास्त झाडांची माहिती व्हावी हा उद्देश सफल होण्यासाठीचा उपक्रम सार्थकी लागला. 

        मुलांना पाने आणण्याचे आव्हान दिले होते. मुलांना असं काहीतरी हटके करायला आवडत असतं. मी ते सांगितलं आणि विसरूनही गेलो. आज शाळेत आलो मात्र, मुलांनी आपला मोर्चा माझ्याकडे वळवला. प्रत्येकाच्या हातात पाने दिसत होती. मी त्यांच्या या कुतूहलाचे हसतमुखाने स्वागत केले. कुतूहल म्हणजे त्यांना प्रत्येकाला आपल्याला माहिती असलेल्या पानांची नावे मला कधी एकदा सांगतो असे झाले होते. पानांची नावे व पाने यांचं सादरीकरण करताना मी मुलांच्या डोळ्यातून ज्ञानरचना पाहत होतो. पहिलीत नव्याने दाखल झालेली मुलेसुद्धा न घाबरता पानांची ओळख सांगत होती. एका मुलाने आपल्या पॅंटीच्या दोन्हीही खिश्यातून पाने काढून दाखवताना मला तो ज्ञानाचा खजिनाच खुला करतोय असे वाटत होते. 

        मी खूप खुश झालो. शैक्षणिक समाधान म्हणजे दुसरे काय असते ?  शाळेची सुरुवातही झाली नव्हती. पण मुलांचे शिक्षण कधीच सुरु झाले होते. मी माझ्या मुलांमध्ये मुलासारखाच होऊन गेलो होतो. 

        परिपाठाचा टोल झाला. सगळी मुले परिपाठाला बसली. सर्वांच्या हातात, खिशात पानेच पाने होती. नवीन आलेल्या विज्ञान शिक्षिका वंजारी मॅडम मुलांशी संवाद साधत होत्या. त्यांनी मुलांना पानांचे प्रकार समजावून सांगितले. सर्व मुलांनी ४३ पानांची ओळख करुन दिली होती.आंबा, काजू, चिकू, फणस, वड, पिंपळ, जास्वंद, सोनचाफा, गुलाब, मोगरा, सागवान, आवळा, चिंच, लिंबू , रामफळ,  सीताफळ,  अशोक, आकेशिया, मयूरपंख, तुळस, न्हिव, रक्तचंदन,  धूप, कापूर, सफरचंद, श्रीकृष्ण वड,  शेवगा,  पपई,  चवळी, पारिजातक,  अश्वगंधा, आपटा, मोरावळा, करवंद, कढीपत्ता, कडुलिंब,जांभूळ,डाळिंब,  शमी, लिंबू, रतांबा, बदाम इतक्या वनस्पतींची माहिती घेताना सर्व मुलांनी चर्चेत उत्स्फूर्त सहभाग घेतलेला मी प्रत्यक्ष पाहत होतो. नवीन बाईं मुलांच्या परिसरात नसणाऱ्या झाडांची पाने मुद्दाम जाऊन एका बागेतून घेऊन आल्याचे समजले आणि मला त्यांचा अभिमान वाटला. अशा विज्ञाननिष्ठ शिक्षकांच्या ताब्यात असणारी मुले विज्ञानप्रेमी होणारच याची मला अधिक खात्री वाटू लागली. शासनाने असे विज्ञान शाखेचे पदवीधर शिक्षक नेमून जिल्हा परिषद शाळेच्या वैभवात अधिक भर घातली आहे. 

        दुपारनंतर मुलांनी आपल्या कल्पनाशक्तीला अधिक चालना देत पानांपासून गणपतीची आकृती बनवली. मुलांच्या अशा अभिनव कल्पनाशक्तीला खरंच सलाम. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शिडवणे नं. १










गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...