Friday, July 12, 2024

🛑 लाडक्या बहिणी शाळेत येतात तेव्हा.....

🛑 लाडक्या बहिणी शाळेत येतात तेव्हा.....

          मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना जाहीर झाल्यापासून गावाकडे शिकलेल्या माहेरवाशिणी आमच्या शाळेकडे येऊ लागल्या आहेत. शाळा सोडल्याचा दाखला मागण्यासाठी शाळेत रोजच या बहिणी किंवा त्यांचे भाऊ, वडील, आई अशी मंडळी येतात तेव्हा खूप आनंद होतो. आनंद याच्यासाठी कि कधीतरी पासष्ट वर्षांपूर्वी शिकायला शाळेकडे आलेल्या आजीबाईसुद्धा आपला दाखला मागायला येत आहेत म्हणून. 

          त्यांच्या वेळचे ते शिक्षक त्यांना आठवत असतील का ? एवढे बोलायलाही तसा वेळ नसतोच, पण आमच्या शाळेला त्यांचे पाय लागत आहेत हे आमचे भाग्यच. आम्हांला काय फक्त एक आणि एकच दाखल्याचा कागद त्यांच्या हाती सोपवायचा असतो. तो सोपवताना आम्ही जी सेवा देतो आहोत, ते पाहून त्यांच्या डोळयांतील कृतज्ञतेचे भाव बघताना जणू आपले नातेवाईक भेटल्याचा भास होतो आहे. या योजनेमुळे शाळेकडे येणारी माणसे दररोज कमीत कमी चार तरी येतच आहेत. 

          आता आमचे काम वाढले आहे हे नक्की. तरीही ते करताना कोणताही थकवा येत नाही हे विशेष. पूर्वी कुणी दाखला मागायला आले कि तो बनविण्यासाठी मोठे कष्ट पडत नसत. मोठ्या शाळेत खूप जुने रेकॉर्ड असते. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातील जन्म झालेल्या आजोबा आजींचे दाखले नेण्यासाठी लोक आठवड्याला दोन तरी येतच असतात. या गोष्टीची आम्हाला सवयच झाली आहे म्हणा ना !!!

          शाळा सोडल्याचा दाखला बनवणे तशी वेळकाढू गोष्ट असते. मागणी घ्या, प्रतिज्ञापत्र बनवा, सात ते आठ रजिस्टरांमध्ये नाव शोधा असे काम असते. एकदा नाव सापडले कि दाखला बनवायला दहा ते पंधरा मिनिटे पुरेशी होऊ शकतात. पण अभ्यागतांकडून जन्मतारीख नीट समजू शकली नाही तर अंदाजाने वय आणि जन्म यांचा मेळ घालत जीर्ण झालेल्या जुन्या जनरल रजिस्टरांमध्ये डोके खुपसताना नाव सापडले कि कोण आनंद होतो म्हणून सांगू ? जो दाखला मागायला आलेला असतो त्याचा चेहरा त्यावेळी बघायला हवा. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झालेला मी अनेकदा प्रत्यक्ष पाहिला आहे. 

          काही सरकारी कार्यालयात एखादा मागणी केलेला कागद मिळण्याचा कालावधी लिहून ठेवलेला असतो. त्यामुळे तिथे तितके दिवस कागद मिळण्यासाठीचा संयम पाळावाच लागतो. मात्र शाळेत असे दाखले लवकर दिले जातात असा माझा अनुभव आहे. तिथे दिवसांचा कालावधी दिलेला आहे का अभ्यासावे लागेल. 

          आलेली माणसे आपल्या ओळखीची असोत किंवा नसोत, दाखले तयार करुन देणे आपले कर्तव्यच असते. ही मंडळी आली की त्यांना थांबायला सांगून अध्यापनाची कामे करणे जीवावर येत असते. कधीतरी हातातले सुरु असलेले काम हातावेगळे करेपर्यंत थांबा अशी नम्र विनंती केली तर लोकं नक्की थांबतात. एक काय दोन दोन तास सुद्धा थांबून दाखला नेणाऱ्या मंडळींची चिकाटी उल्लेखनीयच म्हणायला हवी. अर्थात कधीतरी दाखला द्यायचाच असतो, तर तो आजच दिला तर ? तर आलेली व्यक्ती आनंदी होऊन जाताना दुवा देऊनही जात असावी. 

          आज मी आणि माझ्या शाळेतील तिन्ही शिक्षिकांनी शालेय अध्यापन , पायाभूत चाचणी, केंद्रप्रमुख भेट, पोषण आहार, फुलझाडे लागवड, उद्या होणाऱ्या बांधावरच्या शाळा उपक्रमाची पूर्वतयारी आणि आलेल्या नऊ लाडक्या बहिणींचे दाखले देऊन कामांचा सिक्सरच मारला आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. 

          या सर्व लाडक्या बहिणींना या नव्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर अजून उदंड आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसेल तेव्हा त्या आनंदाची बेरीज होईल. आमच्या शाळेकडे येणाऱ्या सर्व माजी विद्यार्थिनी, माहेरवाशिणी आणि लाडक्या बहिणींचे नेहमीच सहर्ष स्वागत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १



No comments:

Post a Comment

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...