Tuesday, July 25, 2023

🛑 अभ्यासाची गोडी , करी ज्यास वेडी

🛑 अभ्यासाची गोडी , करी ज्यास वेडी

          अभ्यास हा शब्द शाळेत गेल्यानंतर परिचयाचा होतो. शाळा आणि अभ्यास हे एक समीकरणच आहे जणू. बुद्धीला सतत खाद्य मिळत राहायला हवे असते. ते मिळाले कि बुद्धीला धार येत जाते. 

          अभ्यास फक्त शाळेपुरता मर्यादित करायचा नसतो. तो शाळा संपली तरी करता येतो. फक्त तो करण्याची आवड असायला हवी. अभ्यास एके अभ्यास करणारी मुलेही पाहायला मिळतात. 

          ही अभ्यासाची गोडी निर्माण होईपर्यंत काही काळ जावा लागतो. नुकतीच पहिलीत आलेली मुले पुस्तकं किती वेळ हातात धरतात ? एकदा त्यांच्या हातात पुस्तक टिकले ना , मग आपण जिंकलोच. ही पुस्तकेच त्यांना अभ्यासाची आवड निर्माण करत असतात. 

          मुलांची वाचनाची आवड त्यांचं वाचन सुधारायला मदत करत असते. एकदा वाचनवेग वाढत गेला कि मुलांना आपण काय वाचतोय तेही समजत जातं. समजलेलं उमजत जातं. उमजेल तसं वाचनाचा वेळ वाढत वाढत जातो. पुस्तक जास्त काळ हातात टिकलं , म्हणजे अभ्यास खऱ्या अर्थाने सुरु होत जातो. 

          मुलांना शिक्षकांनी शाळेत दिलेला अभ्यास कधी एकदा घरी जाऊन करतो असे झाले पाहिजे. हे व्हायला वेळ लागेलच. पण ही वेळ प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यात लवकरात लवकर जितकी येईल , तितकी मुले स्वयंअध्ययन करु लागतात. ही अभ्यासाची सवय अंगी भिनू लागते , रुजू लागते. हा अभ्यासाचा संस्कार मुलांवर होणे ही काळाची गरज आहे. मोबाईल बाजूला ठेवून मुलांनी पुस्तकांना , वह्यांना , दप्तराला जवळ केले पाहिजे. 

          आज मी शाळेत काय काय शिकलो ? उदाहरणे सोडवली तेव्हा ती बरोबर येण्यासाठी केलेले प्रयत्न कधीही वाया जात नसतात. उत्तरे जशी बरोबर येत जातात , तसा आत्मविश्वास वाढत राहतो. गणिताची तेव्हाच आवड निर्माण होते. माझे पाढे पाठ आहेत , त्यामुळे माझे गुणाकार , भागाकार अजिबात चुकत नाहीत हा गणितविषयक आत्मविश्वास अवघड उदाहरणे सोडवताना कामी येतो. आयुष्यात येणारी भयानक संकटे पार करताना हेच गणित उपयोगी पडत असतं हे आपल्या लक्षातही येत नाही. 

          जाड चष्मा लागला म्हणजे अभ्यासू असे नसते. अभ्यासाबरोबर प्रत्येकात संयम येत जातो. पूर्वीपेक्षा मी अधिक विकसित होत आहे ही जाणीवही पुरेशी असते. 

          अभ्यास करुन कंटाळा आला तर थोडा बदल करायला हवा. जे वाचले , लिहिले ते लक्षात राहण्यासाठी अभ्यास विश्रांती गरजेची आहे. मग एखादे चित्र रेखाटावे , छान गाणे म्हणावे. अभ्यासाने वेगळे प्रकट होताना आपल्यात सर्व विषयात रस निर्माण होत जातो. सुंदर हस्ताक्षर , शुद्धलेखन , मुकवाचन , प्रकटवाचन , उदाहरणांची सोडवणूक हे सर्वच मुलांच्या स्वयंबदलाची नांदीच आहे. 

©️ प्रवीण कुबलसर



Monday, April 10, 2023

🛑 नळी फुंकिली सोनारे

🛑 नळी फुंकिली सोनारे

          आपल्या पंचज्ञानेंद्रियांमध्ये कान हे इंद्रिय अत्यंत महत्त्वाचे कार्य करीत असते. सर्वच इंद्रिये आवश्यक असल्यानेच ती निसर्गाने माणसाला बहाल केली आहेत. तरीही यातील एखादं दुसरं इंद्रिय काम करत नसेल तर शरीरावरील सर्व नियंत्रणच बिघडून जाते. 

          जन्माला येताच मुलाला ताट वाजवून मोठा आवाज ऐकवला जातो. तो ऐकू येईपर्यंत ताट वाजवले जाते. त्या आवाजाच्या तीव्रतेमुळे मूल रडू लागते. रडल्यामुळे त्याची सर्व इंद्रिये सुरु होण्यास सुरुवात होते. डोळे तर उघडलेलेच नसतात , तरीही कानांचे काम सुरु झालेले असते. 

          ऐकू न येऊ शकणारी मुले पुढे बोलुही शकत नाही. त्याच्यावर मूकबधिर , कर्णबधिर असा कायमचा शिक्का बसतो. अशा मुलांची इतर इंद्रिये सशक्तपणे कार्य करताना दिसतात. पण त्यामुळे आपल्या कानांचे महत्त्व कधीही कमी होणार नसते. 

          दोन्ही कान असूनही आपण कितीसे नीट ऐकत असतो. नीट ऐकत नाही आणि अनेकदा अर्थाचा अनर्थ मात्र करुन घेत असतो. नीट ऐकण्याची सवय लावणं ही काळाची गरज आहे. हवे ते ऐकत नाही आणि नको असलेले व्यवस्थित ऐकत बसतो ही आपली चूकच आहे. नाही का ?

          पहाटे पहाटे निसर्गातील विविध आवाज ऐकताना आपण तल्लीन होऊन जातो. हे कर्णमधुर आवाज मनाला सुसंवेदना देत असतात. शहरी जीवनात हे कर्णमधुर आवाज क्वचित ऐकायला येत असतील. चांगले संगीत ऐकताना जसे आपण मोहरुन जातो , तसे कर्कश आवाजाने बेजार होतो. कधी कधी म्हणूनच माणसं एकांतात जाणं पसंत करतात. जीवन इतकं धकाधकीचं झालं आहे की आता या सर्वांची सवयच करुन घ्यावी लागते आहे. 

          आपण एकटेच कधी स्वतःशी बोलत असतो , तेव्हा ते आपण नीट ऐकण्याची क्रिया होत असते. तेवढ्यात अचानक कुणीतरी आपल्या विचारात बाधा आणतं. आपण पुन्हा त्या विचारातून पुन्हा परत सामान्य स्थितीत यायलाही काही मिनिटं लागतातच. विचारांची सरमिसळ होत राहते. प्रत्येक शब्दाला विविधांगी अर्थ असतात. त्यांचा अन्वयार्थ लावणं जिकिरीचं होऊन बसतं. एकाग्रता ढासळते. कान मिटून घ्यावेसे वाटतात. 

          निसर्गाने आपल्याला एकच तोंड दिले आहे. कान मात्र दोन दिले आहेत. याचा अर्थ आपण जेवढे बोलणार त्याच्या दुप्पट ऐकायचे आहे. आपल्याकडून मात्र अगदी उलट घडत असतं. आपण ऐकतो कमी आणि बोलतो जास्त.

          माझ्या एका मित्राने मला एक वाक्य शिकवले होते. तो म्हणे , " यान माडती कान झाडती , कानात माशी कुडकुडती " हे वाक्य आम्हाला ' कन्नड ' वाटत असे. पण त्याचं खरंच आहे , आपल्या कानाकडे जर एखादी माशी किंवा डास गुणगुणत असेल , तर आपल्याला राग येऊन आपण आपला कान झाडतोच ना ? 

          या आपल्या कानांची आपण अतिशय काळजी घ्यायला हवी. तीव्र आवाज ऐकू नयेत. हल्ली डॉल्बी सिस्टीमने वाजणारे आवाज कानठळ्या आणतात. कानातूनच नव्हे तर सर्व शरीराला कंप फुटतो. असे आवाज नित्य ऐकू आले तर लवकरच श्रवणऱ्हास होणार हे ठरलेले असते. गाड्यांचे कर्णकर्कश भोपु तेच तर करतात. ध्वनी प्रदूषण होते आणि कानांच्या यंत्रांची भर पडत जाते. श्रवणयंत्र लावण्याचे प्रमाणही वाढत चालले आहे. श्रवणयंत्र नाही म्हणून की काय प्रत्येकाच्या कानात ' इयरफोन ' सारलेला असतो. ब्लुटूथच्या नावाने विकतचे प्रदूषण यंत्रच बसवून कर्णरोगांना आमंत्रण देणे सुरुच आहे. कानात इयरबड घालून खुळ्यासारखी रस्त्याने एकटीच बडबडत चाललेली माणसे बघून हसू आवरत नाही. या आधुनिक यंत्रांचा अतिरिक्त वापर कर्णदोषांना जन्म देत आहे हे वेगळे सांगायला नको. मोबाईलवर तासनतास बोलत बसणारी माणसं वृद्धापकाळात कानांच्या त्रासाने पिडीत होणार हे नक्कीचे आहे. 

          आपले कान चांगले ठेवायचे असतील तर हे सर्व टाळलं पाहिजे. कानात खाज आली तर आगकाडीची काडी घेऊन कान आनंदाने पोखरत बसलेल्या लोकांचे चेहरे पाहिले तर ते पट्टीच्या अभिनेत्याला लाजवतील असे असतात. शेवटी आपले इंद्रिय आहे , त्याचा कसा वापर करायचा ते ज्याचे त्याने ठरवले पाहिजे.  

©️ प्रवीण अशितोष कुबल , पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ ( कणकवली )





Saturday, March 4, 2023

🛑 शुभ्र मायेचा सागर

           श्यामची आई हा चित्रपट बालपणी पाहिला होता. त्यात आईच्या मायेची थोरवी सांगण्यात सानेगुरुजींनी शब्दांमध्ये जणू प्राणच ओतले आहेत. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी ' श्यामची आई ' या पुस्तकाला ' पवित्र मंगल स्तोत्र ' म्हटले आहे. 

          कारागृहात बेचाळीस रात्री गोष्टी सांगत असताना त्यांच्या मुखातून आईच्या मायेचा हा सागर ओसंडून वाहत होता. त्यांच्या डोळ्यांतून त्यावेळी अश्रूंचा महासागर वाहत असेल हे वेगळे सांगायला नको.

          आजही ' श्यामची आई ' हे पुस्तक वाचताना प्रत्येकवेळी प्रत्येकाचे डोळे पाणावले पाहिजेत अशी ही आईवरील निर्व्याज प्रेमाच्या अश्रूंनी लिहिली गेलेली कादंबरी विरळीच म्हणायला हवी.

          शाळेत पहिलीत प्रवेश घेणारी मुले शाळेत पाऊल ठेवण्यापूर्वी आपल्या आईचं बोट सोडायला तयार होत नसतात. शाळेत स्थिरावली तरी त्यांचं अधिकचं लक्ष घरी आईकडेच लागलेलं असतं. शाळेतील बाईंमध्ये जेव्हा ही मुले आपल्या आईचं रुप पाहतात , तेव्हा कुठे त्यांना थोडाफार आईचा विसर पडत असेल. 

          तरीही शाळा सुटण्याच्या वेळी आईची वाट पाहत बसलेली आणि आई दिसली की वायुवेगाने आईच्या दिशेने धावणारीही मुले पाहिली आहेत. एवढी असते प्रत्येकाला आपल्या आईची ओढ. आपली आई अजून आपल्याला न्यायला आली कशी नाही ? हा प्रश्न पडताच डोळ्यांतून गंगा यमुना आपोआप वाहायला लागतात ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत घडली असेलच. 

          मुले मोठी होत असली तरी आई मोठी होत नाही. घरी जाताच आईला कडकडून मिठी मारणारी मुले पाहिली की परत लहान व्हावंसं वाटतं. लहान असतानाचे तिच्यासोबतचे हृद्य क्षण आठवतात आणि तिच्या प्रेमाने व्याकुळ व्हायला होतं. डोळ्यातून हलकेच पाणी तरळतं. मायेच्या सागराला जणू भरती येते. 

          शाळेत सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होत होते. एक दुसरीतील आठ वर्षांची मुलगी ' एकल गीत ' म्हणण्यासाठी रंगमंचावर आली. मी सूत्रसंचालक होतो. मुलीने आपले गाणे म्हणायला सुरुवात केली. तिच्या मधुर आवाजाने सर्व प्रेक्षक शांत झाले. गाण्याचे बोल असे होते. 

" आई माझी मायेचा सागर

तिने दिला जीवना आकार

आई वडील माझे थोर

काय सांगू त्यांचे उपकार

जीवनाच्या वाटेवरती 

किती असतो त्यांचा आधार " 

          याही पुढे आईच्या मायेची महती सांगणारे शब्द काव्यरूपाने तिच्या मुखातून बाहेर पडतच होते. मुखातून बाहेर पडणारा प्रत्येक शब्द ती स्वतः जगत होती. तिची आई तिच्या समोरच प्रेक्षक म्हणून बसली होती. मुलीचं गाणं इतकं हळवं होतं , की ती मुलगी स्वतः हुंदके देत पुढची कडवी म्हणत होती. मलाही गहिवरुन आलं. मी तिच्याजवळ गेलो आणि तिच्या पाठीवर आश्वासक हात ठेवला. तिचे गाणे संपेपर्यंत मी कमालीचा निःशब्द झालो होतो. माझी आई मला काही क्षणासाठी माझ्या पाठीवर स्पर्श करुन गेल्याचा भास झाला.

©️ प्रवीण अशितोष कुबल

पदवीधर शिक्षक , शिडवणे नं.१ ( कणकवली )



Sunday, November 27, 2022

🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........मी स्वतः

  🛑 पत्रकार मा. गणेश चव्हाण ( श्रावण ) यांच्या लेखणीतून ........

🔹 प्रवीण कुबल यांच्याबद्दल थोडेसे ....

          अभ्यासूवृत्ती मानवाला ज्ञानाच्या शिखरावर नेते. यामुळे माणसाकडे शांती, संयम आणि व्यक्तिमत्व विकास करण्याची क्षमता येते. असेच अभ्यासू व्यक्तिमत्व, संघटनात्मक प्रचंड अनुभव, कुशल संघटक, समाजात विविध पद भुषविलेले, कार्यक्षम  समाजसेवक, शांत, संयमी पण परखड व्यक्तिमत्व, 

नाभिक समाजाची आन , बान , शान...  आपले सर्वांचे लाडके आधारस्तंभ, सत्यवादी मार्गदर्शक एक निस्वार्थी शिल्पकार 

सन्माननीय श्री. प्रवीण अशितोष कुबलसर .....

आपणांस वाढदिवसाच्या

मन:पुर्वक शुभेच्छा .....🌹

          शिक्षक कसा असावा ही प्रेरणा आपण समाजासाठी देऊन , भालचंद्र बाबांच्या कणकवली नगरीने आपणाला मोठे केले. किर्लोसचे गावचे भाग्यविधाते आणि गरीबांचा कल्पतरु. सन्माननिय श्री. प्रवीण अशितोष कुबल सर , आज आपला ४७ वा वाढदिवस. या जन्मदिनानिमित्त , आजपर्यंत तुम्ही केलेल्या जनसेवेबद्दल भरपुर  लिहीण्यासारखे आहे. परंतु वेळेअभावी तुमची प्रगती व जनसेवा थोडक्यात लिहिण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.

          🔹माझ्या भावना आपल्या पर्यंत व्यक्त करण्यासाठी तशी वेळच आली नाही. परंतु या भावना , ही तळमळ तुमच्यापर्यंत पोहोचविण्याचा हा एक केविलवाणा प्रयत्न..........

          तुमच्या आयुष्यातला प्रत्येक क्षण, आव्हान म्हणून जगणारे आपण प्राविण्यशिल अरुणोदय आहात. अनंताच्या कृपेने,  मिळालेलं आयुष्य , म्हणजे आपल्यासाठी केवळ आनंद आणि मजा असं कधीच नव्हतं. आपल्यासाठी, आयुष्य म्हणजे येणारा प्रत्येक क्षण आव्हान म्हणून स्विकारणं आणि जिद्दीने त्याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य मानलात....

          आयुष्य म्हणजे संघर्ष  आहे. हे तुम्ही तुमच्या जीवनात शिकलात. म्हणुनच संकट म्हणुन आलेल्या प्रसंगाला सामोरे गेलात. त्याचबरोबर  समाजाची सेवा करतांना भगवंताचा आशिर्वाद व तुमची प्रचंड इच्छाशक्ती (आत्मविश्वास) हाच तुमच्या जीवनात महत्वाचा ठरला. आपले संघर्षमय जीवन तुमच्या संसाराबरोबर , नाभिक बांधवांनाही फायदेशीर झाला. तुमचे विचार, अनमोल मार्गदर्शन समाज बांधवांना मिळत आहे. हे समाजाचे भाग्य आहे. तुम्ही नाभिक समाजाचे आधारस्तंभ बनलात. म्हणुनच आम्हांला आपला सार्थ अभिमान आहे.

          आई तुळजाभवानी आपणांस उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य देवो ! हीच रामेश्वर व योगी भालचंद्र महाराज यांच्या चरणी  प्रार्थना. 🙏

  शुभेच्छुक :

🔸 पत्रकार गणेश चव्हाण , श्रावण ९४२००८४१२५

🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿



Saturday, November 19, 2022

🛑 निष्पाप मुलांचा विश्वास

🛑 निष्पाप मुलांचा विश्वास 

          सहा तास मुलांसोबत असले तरी शिक्षक म्हणजे मुलांचे आदर्श व्यक्तिमत्त्व असतात. पूर्ण दिवसाच्या पाव भागापुरते मुलांसमोर वावरणारे शिक्षक अप्रत्यक्षपणे मुलांसोबतच असतात. ही मुलेही शिक्षकांच्या सदासर्वदा डोळ्यासमोर येत राहतात. कारण शिक्षक नेहमी आपल्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या मुलांसारखंच नव्हे , तर त्याहीपेक्षा जास्त प्रेम देण्याचा प्रयत्न करतात. 

          कधी त्यांना रागावतात , त्यांना चापटी देतात. छोटी मुलं हे सर्वकाही काही क्षणात विसरुन जातात. मात्र ओरडल्यानंतर त्यांना जवळ घेणे , नीट समजावून सांगणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. 

          शिक्षक होणं कदाचित सोपं असू शकतं , पण शिक्षक म्हणून जगणं एक कठीण गोष्ट आहे. त्यासाठी मुलांच्या भावविश्वात डोकावायला हवे. हे एकदा जमले की तुमच्या समोरची मुले तुमची मुले होऊन जातात. ती तुमच्यावर इतका विश्वास ठेवतात की पालकांवरही त्यांचा तितका विश्वास नसतो. 

          तुम्ही मुलांना एखादा शब्द देता , तेव्हा त्या शब्दाला जागणं महत्त्वाचं आहे. नाहीतर मुलांचा तुमच्यावरील विश्वास कमी होण्याची भीती असते. शिकवताना बोलता बोलता आपण मुलांना विविध उपक्रमांची माहिती देत असतो. ते करवून घेत असतो. उपक्रम असला की मुलं त्यात अधिक लक्ष घालतात. आपण शिकवतोय असं मुलांना वाटलं तर मुलांचं लक्ष विचलित होऊ शकतं. 

          याचा अर्थ असा आहे की मुलांना शिकायला आवडत असतं , पण शिकवून घ्यायचा कंटाळा येत असतो. एखादी गोष्ट त्यांना करायला दिली की ती लगेच तयार होतात. भाग न घेणारी मुलेही त्यात भाग घेऊ लागतात. 

          आज आमच्या शाळेतील मुलांना शिक्षक होण्याची संधी दिली होती. दोन दिवस मुलं आपण शिक्षक बनणार या कल्पनेनेच अधीर झाली होती. शनिवारी सकाळची शाळा म्हणजे थोडी उशिरा येणारी मुले आज मात्र शिक्षक बनून लवकर शाळेत दाखल झाली होती. त्यांच्या अंगात आज शिक्षक शिक्षिका संचारल्या होत्या.

          सर्व विद्यार्थी आजच्या नव्या शिक्षकांना सर ,मॅडम म्हणत होती. ते ऐकताना नवीन शिक्षक झालेल्या विद्यार्थ्यांच्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आज त्यांना शिक्षकांसारखे खुर्चीत बसायला मिळाले होते. 

          नव्या टिचर्सनी छान प्रार्थना घेतली. विद्यार्थी असताना लुडबुड करणारे शिक्षक आज मात्र गंभीरपणे प्रार्थना म्हणताना दिसत होते. त्यांचा एक दिवसाचा शिक्षक होण्याचा आनंद देत असताना आम्हां  शिक्षकांनाही नवीन शिक्षकांबद्दल अतीव आदर वाटत होता. शिक्षकांचा पेहराव मुलांच्या तनामनात शिक्षकांचं जगणं पेरुन गेला होता. शाळा सुटेपर्यंत विद्यार्थ्यांनी केलेली शिक्षकांची भूमिका शिक्षकी पेशाला साजेशी अशीच होती. नवीन शिक्षक मुलांना प्रेमाने शिकवत होते. कुणी आपल्या फळ्यावरील तिरप्या अक्षराला पाहून हसत सुटले होते. मी वर्गावर्गात जाऊन त्यांचे फोटो घेत होतो. कुणाचेही फोटोकडे लक्ष नव्हते. प्रत्येक शिक्षक आपल्या वाटणीला आलेल्या विद्यार्थ्यांना शिकविण्यात दंग असलेले पाहून मलाही तोंडात बोट घालण्याची वेळ आली. 

          ही छोटी मुले इतकी निष्पाप असतात की त्यांचा आपल्या शिक्षकांच्या प्रत्येक गोष्टीवर ठाम विश्वास असतो. या मुलांचे पालकही लहानपणी तसेच असले पाहिजेत. त्यांचाही आपल्या शिक्षकांवर विश्वास होताच असणार. हा शिक्षकांबद्दलचा आदर आणि विश्वास सदासर्वकाळ वाढवत नेण्यासाठी प्रत्येक शिक्षकाने जर जाणीवपूर्वक प्रयत्न केले तर ? 

©️ प्रवीण अशितोष कुबल , कणकवली

( 9881471684 )




Sunday, October 30, 2022

लिहिते व्हा

 ⚫ लिहिते व्हा ........ 

          नमस्कार मुलांनो , कसे आहात सगळे. मजेत ना ? अर्थात मजेतच असणार म्हणा. कारण तुम्हाला सध्या दिवाळीची हिवाळी सुट्टी आहे ना ? दिवाळीत मौज मज्जा करत असाल तर हे वाचायलाही तुमच्याकडे वेळ नसेल याचीही खात्री आहे. तरीही वाटलं , तुमच्याशी थोडं बोलावं. मला तर तुमची आठवण येते आहे. तुम्हाला ती येत असेल किंवा नसेलही. असो. तुम्ही तुमच्या दिवाळी सुट्टीत काहीतरी भन्नाट करत असणार ना ? म्हणजे तुम्हाला आवडणाऱ्या अनेक उत्तम गोष्टी करण्यात दंग असाल. तुमच्या कारागिरीची दाद द्यायलाच पाहिजे. पण तुम्हाला या सर्व कार्यभारातून उसंत मिळाली तर तुम्ही काही काळ लिहिण्याचा प्रयत्न करता काय ? सध्या लिहिणे ही दुर्मिळ गोष्ट होऊन बसलेली आहे.

          चॅटिंग पुरते लिहिणे शिल्लक राहिलेले आहे. तेही शॉर्टकट्स वापरुन लिहिलेले असते. त्यात शुद्धलेखनाच्या प्रत्येक शब्दांत चुका पाहिल्या की वाचणाऱ्याला पुढच्या पिढीच्या लेखनाविषयी काळजी वाटायला लागते. म्हणून तुम्ही जसे वाचन करता , तसे लेखन करण्यासाठी मुद्दामहून वेळ काढला पाहिजे. कोणताही विषय घेऊन त्यावर पाच , दहा ओळीत लिहिता आले पाहिजे. निबंध लिहायचा असेल तर अधिकच उत्तम.

          तो लिहिताना तर तुम्हाला तुमच्या मनातील विचार अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त होण्यासाठी संधी उपलब्ध झालेली असते. तुम्ही एकदा लिहायला सुरुवात केलीत ना , मग तुम्हाला विचार करण्यासाठी डोकं चालवावं लागतं. तुमचं डोकं चालायला लागतं आणि तुमचं लेखन कागदावर उतरु लागतं. तुमच्या लक्षातही येणार नाही की तुम्ही किती छान लिहिताय ते !!!

          तुमच्याकडून एक सकस लेखन घडू लागण्याची ती सुरुवात असते. मात्र ही सुरुवात करणं फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जमेल ते. प्रयत्न केलात तर तुम्ही कितीतरी छान छान निबंध , लेख , कविता , सुविचार लिहू शकाल.

          तुम्हालाच तुमचं आश्चर्य वाटेल की तुम्ही किती सुंदर लेखन करु शकताय ते !!! आता आधी सोप्या , साध्या विषयांवर लिहायला प्रारंभ करा. जे सुचेल ते लिहीत चला , ते नको वाटेल तेव्हा खोडण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे ना !! अक्षर वळणदार असले तर आणखी उत्तम.

          तुमचं लेखन व्याकरणदृष्ट्या बरोबर येण्यासाठी थोडा वेळ लागेल. लागू दे वेळ. होईल तेही बरोबर. थोडा संयम ठेवा.

          आज लिहायला सुरुवात केलीत आणि उद्या लेखक झालात असे होऊ शकणार नाही. त्यासाठी वाट बघावी लागेल. खूप चांगलं वाचावं लागेल. खूप चांगला विचार करावा लागेल.

खूप चांगलं ऐकावं लागेल. हे सगळे करता करता हळूहळू आपल्या लेखनाची गुणवत्ता वाढत जाईल हे तुमच्याही लक्षात येईल. तुम्ही लिहिलेले दुसरे कोणीतरी वाचणार आहेत हे लक्षात घेऊन जर लेखन केलेत तर तुमचे लेखन वाचनीय बनावे यासाठी तुम्ही विचारपूर्वकच लिहाल. तुमच्या लेखनाला कोणीही प्रतिसाद देतील तेव्हा तुमचा आनंद कुठेही मावणारा नसेल.

          म्हणून लेखनाची कास धरा. पेनाने लिहिलात तर ती एक चांगली सवय आहे. तुम्ही लिहिलेले तुमच्या दैनिक वहीत संग्रहित होईल. तुमच्या स्वतःच्या रचना वाचताना तुम्हाला स्वर्ग अगदी जवळ आल्यासारखा वाटेल.बघा तरी करुन. 

©️ प्रवीण अशितोष कुबलसर ( 9881471684 )



गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...