🛑 सुट्ट्या संपल्या आता अभ्यास सुरु
शाळा सलग सुरु असली कि सुट्टी पडावी असे वाटते. पण सलग सुट्टी असली कि कधी एकदा शाळा सुरु होते असे वाटते. सुट्टीपेक्षा शाळेत जाणं कितीतरी पटीने आनंददायक असतं.
एप्रिल मध्ये परीक्षा संपल्या कि मुले सर्रास शाळेत जाणं बंद करतात. अर्थात शाळेतील अध्यापन बंद झालेलं असलं, तरी संस्कार देणं सुरुच असतं. संस्कार हिच आपल्या आयुष्याची शिदोरी असते. सुसंस्कारीत पिढी घडविण्याची मोठी जबाबदारी शाळेने स्विकारलेली असते. अर्थात शाळेतील सहा तास संस्कार करताना शाळेला सुद्धा मर्यादा पडतात.
शाळा सुरु झाली कि अभ्यास सुरु होतो. अभ्यास सुरु झाला कि वाचन, लेखन आणि संभाषण सुरु होत असते. मुलांनी सर्व कला कौशल्ये अवगत करण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रमांचे नियमित आयोजन केलेले असते. सध्या तर शाळांमध्ये उपक्रमांचा पूरच आलेला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये.
अर्थात उपक्रम हे मुलांच्या भल्यासाठीच असतात. त्यातून मुलांचं विकसनच लक्षात घेतलेलं असतं. केवळ पुस्तक शिकवलं म्हणजे मुले शिकली असं होत नसतं. केवळ पाठांतर केलं म्हणजेही अभ्यास होत नसतो. आपण जे वाचलं, लिहिलं ते समजलं किती हे अधिक महत्त्वाचे आहे.
आजची मुले घरी आल्यावर नुसती लेखनात दंग असतात. बिचाऱ्यांचे कंबरडे मोडत असेल लिखाण करुन. पण दिलेला अभ्यास पूर्ण झाला पाहिजे अशा सूचना दिलेल्या असतात. त्या सुचनांचे पालन करताना मुलांचे काही चुकत नसावे. लिहूनही अभ्यास होत असतो. कारण लिहितानासुद्धा आपण पुन्हा एकदा वाचतोच ना? पण नुसते उतारे मारल्याने काहीही साध्य होत नसतं. काही मुले अक्षरशः कॉपी टू कॉपी आणि माशी टू माशी करताना दिसतात. त्यांना आपण लिहिलेलं ओ की ठो समजत नसतं. असे लेखन निष्फळ ठरत असते.
म्हणूनच मुलांनी दररोज वाचन केलं पाहिजे. वाचताना ते समजपूर्वक वाचलं पाहिजे. समजत नसेल तर पुन्हा पुन्हा वाचलं पाहिजे. वाचाल तर आयुष्यात नक्की वाचाल. वाचन माणसाला आयुष्यात समुद्ध अनुभव देत असतं. वाचनानंतर लेखन येतं.
बघून कोणीही लिहिल. स्वतः विचार करुन लिहिणं जमलं कि लेखन आलंच म्हणून समजा. पण आपल्या सर्वांना नेहमीच आधाराची सवय झालेली आहे. गाईड हा आपला संदर्भग्रंथ झालेला आहे. त्यामुळे आपल्या डोक्याला चालना देण्याचं राहूनच जातं. दिलेल्या प्रश्नांची उत्तरे इंटरनेट सर्च करुन शोधण्यात आपण कमालीचे पटाईत झालो आहोत. मग आपल्या बुद्धीला चालना कधी मिळणार ?
शाळा सुरु झालेल्या दिवसापासून प्रत्येक मुलांनी आणि पालकांनी या गोष्टींचा विचार केलात तर केलेला अभ्यास चिरकाल लक्षात राहण्याची शक्यता जास्त असते. कारण ती पोपटपंची नसते, तेच खरे स्वतःहून केलेले स्वयंअध्ययन असते.
शाळा सुरु झाल्यापासून पहिल्या पंधरा दिवसांत प्रत्येक शाळेत शाळा पूर्वतयारी अभ्यासक्रमाची अंमलबजावणी सुरु होते. मागील वर्षाचे ज्ञान पुन्हा उजळणी स्वरूपात घेण्यात येत असते. किती मुले कोणत्या गोष्टीत मागे आहेत, हे त्यामुळे समजत असते. मुलांनी मराठी पुस्तकाचे वाचन करीत राहावे. हिंदी कविता वाचाव्यात. शिक्षकांनी शिकविण्यापूर्वी पुढे पुढे वाचत गेल्यामुळेही खूप चांगला फरक पडू शकतो. पाढे पाठ करावेत. विसरायला होतात म्हणून पुन्हा पुन्हा म्हणून पाहावेत. गुणाकार आणि भागाकार या प्रक्रिया त्यावरच अवलंबून आहेत.
गेले महिनाभर सुट्टीत अनेक मुलांनी पेन हातात घेतलेले नसेल. त्यांना तर आता अचानक लिहिताना जमणार नाही. म्हणून आजपासून दररोज पाच ओळी शुद्धलेखन, अनुलेखन सुरु करायला हरकत नाही. इंग्रजी शब्दसंग्रह वाढावा म्हणून इंग्रजी पुस्तकातील वाचायला येत असलेल्या शब्दांची यादी करावी. अनोळखी शब्दांची वेगळी यादी काढून इंग्रजी शब्दकोशात त्यांचे अर्थ जाणून घ्यावेत.
अर्थात अभ्यास करायचा असेल तर दिवसाचा वेळही पुरणार नाही. पण मनापासून करायचाच नसेल तर शिक्षकांनी दिलेला अभ्यास फक्त वहिपुरता मर्यादित राहील, डोक्यात कधीच जाणार नाही हे शंभर टक्के खरे असल्याची प्रचिती आली आहे. म्हणून आजपासून अभ्यासाला लागा.
©️ प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक शिडवणे नं. 1
.jpeg)

.jpeg)




