🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव
सध्याचे जीवन अतिशय धकाधकीचे, स्पर्धेचे आणि अतीतणावाचे झाले आहे. तणावाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्याशिवाय दिवस संपतही नाही. या तणावांचा सामना मोठ्यांनाच नव्हे तर लहानांना देखील करावा लागत आहे. सुट्ट्या पडल्या तरी हा तणाव त्यांची पाठ सोडत नाही. काहीवेळा थोडा तणाव हा जीवनावश्यक असतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वजण तंत्रस्नेही बनत चालले आहेत. जेवढे तंत्रस्नेही बनतील तेवढे त्यांचे तणाव वाढतील. तंत्रस्नेही बनणे जरुरीचे असले तरी त्यामुळे माणसांची जीवनशैली बदलत चालली आहे.
कित्येक तास मोबाईलवर , लॅपटॉपवर किंवा टॅबवर अभ्यास करणारी मुले पाहिली कि त्यांची खरंच चिंता वाटू लागली आहे. विविध आभासी गेम्स खेळणारी मुले पाहूनही त्यांच्या भावी जीवनाचे काय होईल याची कल्पनाच करवत नाही. एकूणच काय आपल्या दैनंदिन जीवनाचे ‘ मिशन लाईफ ’ भरकटत चालले आहे. ही भरकटणारी जीवन नौका व्यवस्थित पैलतीरावर आणावयाची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला पर्यावरणाविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे झाले आहे.
म्हणूनच की काय शासनाने ‘ उन्हाळी शिबीर ’ ही संकल्पना आणलेली असू शकते. मुलांना सुट्टी असताना ५ जून ते ११ जून असे सात दिवस सात थीम्स घेऊन ही संकल्पना उपक्रमस्वरुपात राबवणे असा शासन आदेश आहे. हे शिबीर राबविण्यात अनेकांना अडचणी आलेल्या असू शकतात. पण शाळा सुरु झाल्यानंतर सुद्धा आपण या परिपत्रकाचा आधार घेऊन यावर्षी शालेय दिवसांमध्ये किंवा पुढील मोठ्या सुट्ट्यांमध्ये असे पर्यावरणप्रेमी उपक्रम राबविल्यास मुलांना ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यास नक्कीची मदत होऊ शकते असे वाटते.
सुट्ट्या पडल्या की मुलांचे काय करायचे हा यक्ष प्रश्न प्रत्येक पालकांना पडत असतो. मी शिक्षक असलो तरी मी पालक म्हणून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मलाही तसेच वाटते. ग्रामीण भागातील मुले सुट्टीच्या काळात शहरात जातात. शहरी भागातील मुले आपल्या गावाकडे सुट्टीचा आनंद घ्यायला जातात. कदाचित हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारे उन्हाळी शिबीरच आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. पण त्यात नियोजनबद्धता नसते. त्यात विविध मर्यादा पडतात. सुसंस्कार होतील याची गॅरंटीही नसते. त्यामुळे जे पालक आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करू शकतात , ते पालक आपल्या मुलांना अशा खाजगीत होणाऱ्या उन्हाळी शिबिरांना पाठवतात. तिथे मुलांना स्वतःची कामे स्वतःच करावी लागतात. मुलांचा पूर्ण दिवस वेळापत्रकाप्रमाणे आखलेला असतो. कधी काय उपक्रम करायचा हे लेखी स्वरूपात लिहिलेले असते. खाणे , पिणे , हुंदडणे आणि बरेच काही घड्याळाच्या काट्यावर चाललेले असते. सर्वसामान्य मुलांच्या पदरात या गोष्टी पडतच नाहीत. त्यांना घरची कामे करावी लागतात. सुट्ट्या त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी पोषकच असतील हे सांगता येत नाही. तरीही ही मुले सुट्टीचा आनंद घेतातच. आपल्या जवळच्या आजोळी जाऊन मामाच्या घरी आनंद घेणारी मुले मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मी स्वतःही अशा अनियोजनबद्ध शिबिराचा आनंद घेऊन मोठा झालो आहे. पण पालक झाल्यानंतर माझी मुले नियोजनबद्ध उन्हाळी शिबिराचा भाग बनावीत असे मला कित्येकदा वाटले आहे. पण मी काही माझ्या मुलांना शिबिरांचा लाभ देऊ शकलेलो नाही.
आजच्या शिक्षकांना दररोज विविध उपक्रम राबविण्याचा तणाव नक्की येत असेल. तरीही आपल्याला जमेल तसे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करताना दिसत आहेत. उपक्रम राबवले म्हणजे आपण यशस्वी होत नसतो. त्यांची फलनिष्पत्ती दिसली कि आपल्याला लाखमोलाचे समाधान वाटत असते. आजची मुले जीवनात पुढे यशस्वीपणे झुंज देण्यासाठी सक्षम बनविण्याची बिजे या उपक्रमांत असतात. आपल्या मुलांची ही पिढी भावी आयुष्यात सकारात्मकतेने , सुदृढतेने जीवन जगताना दिसतील तेव्हाच आपल्या उपक्रमांना यश मिळाल्याचे लक्षात येईल.
त्यासाठी मुलांनी निसर्गावर प्रेम करायला शिकायला हवे. निसर्गफेरी आयोजित करून आपण त्यावर काही प्रमाणात मात करू शकतो. परिसरात झाडे लावून त्यांचे जतन करताना मुलांचे वृक्षप्रेम जागृत होईल. आपल्या जवळपास पर्यावरणप्रेमी क्षेत्रभेटी आयोजन करत असताना मुले भावी उद्योजक बनू शकतात. ही पहिल्या दिवसाची थीम आहे.
शाळेत पोषण आहार सुरु आहे. त्यात शाळेत पिकविलेल्या भाज्या शिजवून देताना त्यांच्यात श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल. परसबागेचे उपक्रम त्यासाठीच तर आहेत. जेवल्यानंतर उरणारे अन्न किंवा कचरापेटीत टाकावयाचे अन्न म्हणजे ओला कचरा आहे. त्याचेही व्यवस्थापन त्यानिमित्ताने मुलांना समजावे हा हेतू आहे. मुलांनी हा ओला कचरा स्वतः शोषखड्ड्यात टाकावा , त्याचे बनलेले कंपोस्ट खत आपल्या परसबागेत वापरता येते. ही जी जीवनशैली आहे ती खरी आरोग्यशैली आहे याची ओळख या अशा इको क्लबमधून दिल्यास अधिक उत्तम होईल.ही दुसऱ्या दिवसाची थीम आहे.
सध्या शाळेमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यांच्या सततच्या वापराने ती खराब होत असतात. त्यामुळे तो सुद्धा एक कचराच होतो. त्याचा कसा निचरा करावा हेसुद्धा मुलांना या तिसऱ्या दिवसाच्या थीममधून सांगणे अपेक्षित आहे. त्यासाठी अशा कचऱ्याचा विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांशी संपर्क करणे ही पुढील काळाची गरज असणार आहे हेही मुलांना समजाविता आले तर त्याचाही मुलांना पुढील जीवनात फायदाच होणार आहे.
शालेय जीवनात परिपाठापासून सफाई कामाला सुरुवात होते. मोठ्या शाळेमध्ये परिसर मोठा असतो , त्यामुळे सुका कचरा जास्त असतो. पोषण आहार योजनेत ओला कचरा निर्माण होतो. दोन्ही कचऱ्याचे व्यवस्थापन मुलांना शिकविले गेले पाहिजे. त्याचा उपयोग ही मुले आपल्या घरी देखील करतील. कचरा व्यवस्थापन केल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू असतात. या टाकाऊ वस्तू सुद्धा काहीवेळेला टिकाऊ करण्याची क्षमता मुलांमध्ये आणली जाऊ शकते. मुले कल्पक असतात , त्यांना हे काम दिले कि मुलांच्या विचारचक्राला चालना मिळते. मुले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून विधायक कार्य करण्यास प्रेरित होतात. पुढील आयुष्यात त्यांना अशा अनेक संकटांना तोंड देताना या कौशल्याचा उपयोग हमखास होणार आहे. ही चौथ्या दिवसाची थीम आहे.
पाचव्या दिवशी मुलांची ‘ ऊर्जा समिती ’ स्थापन करावयाची आहे. अक्षय ऊर्जा या विषयावर मुलांना एखादे प्रबोधनपर व्याख्यान देता आले तर नक्की आयोजन करावयाचे आहे. सौर ऊर्जेचा वापर करुन आपली कामे मार्गी लावता येतात हेही त्यांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. शाळेमध्ये सौर ऊर्जा पॅनल देखील असू शकतात. त्यांचा वापर करुन आपण एक प्रकारे ऊर्जेची बचतच करत आहोत हेही मुलांना समजू शकेल. ऊर्जा संवर्धनाकरिता मुलांची पोस्टर स्पर्धा देखील आपण आयोजित करू शकतो.
शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. पाणी हे जीवन आहे. ते कमी असताना किंवा टंचाई असताना आपण ते जपून वापरतो. परंतु ते मुबलक प्रमाणात असले तरीही ते जपूनच वापरले पाहिजे ह्या सवयी मुलांच्या अंगी रुजविणे यातून शक्य होऊ शकते. शुद्ध , अशुद्ध पाणी आणि जलसंधारण विषयक मार्गदर्शने आयोजित करता येऊ शकतात. ही सहाव्या दिवसाची थीम आहे.
शाळांमध्ये हल्ली प्लास्टिक पिक अप डे साजरे केले जातात. प्लास्टिक कचरा ही पर्यावरणाची फार मोठी समस्या आहे. मुलांनी प्लॅस्टिकच्या वस्तू न वापरता किंवा त्यापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता भावी जीवनात जागृत व्हावे हा यामागील हेतू आहे. मुलांनी जाणीवपूर्वक प्लास्टिकरहित वस्तूंचा कायम वापर करावा अशा सवयी लावता आल्या तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शाळेत पोस्टर मेकिंग स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , घोषवाक्ये स्पर्धा इत्यादी घेता येऊ शकतात.
ही या उन्हाळी शिबिरातील सातव्या दिवसाची थीम आहे.
अर्थात असे सप्ताह किंवा शिबिरे आयोजित करुन मुलांच्या , पालकांच्या आणि समाजाच्या मनात विविध समस्यांची जाणीव निर्माण करुन देणे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे काम आहे. हे काम निरंतर करणे ही खरी गरज आहे. पण याद्वारे जागृत झालेली मुलांची मने पुढे अधिक समृद्ध आरोग्यदायी पिढी घडवतील अशी आशा बाळगूया.
Ⓒ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १
मार्गदर्शक : शिक्षण परिषद , २५ जुलै २०२४ : केंद्र शेर्पे व खारेपाटण