Thursday, October 17, 2024

🛑 शारदे हवे तुझे वरदान

 🛑 शारदे हवे तुझे वरदान


          मुलांनो, नुकताच प्रत्येक शाळेत ' शारदोत्सव ' संपन्न झाला असेल. तसाच तो आमच्या शाळेतही दिमाखात साजरा झाला. तुमच्याही शाळेत ' सरस्वती पूजन ' झालेच असेल. हो ना!!!!

          दरवर्षी हा दिवस येतो. पण प्रत्येक वर्षाचा अनुभव आगळा वेगळा असतो. सरस्वती मातेचं ते तेजस्वी रुप पाहून मन भरुन येतं. मला बालपणापासून ' शारदा पूजन ' खूप आवडत आले आहे. मी शिक्षक झाल्यामुळे मी सतत तिच्यासोबत आहे याचा मला अभिमान आहे. तिचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी आहे म्हणून मी ' गुरुजी ' झालो आहे. 

          माझे प्राथमिक शिक्षण कणकवली नं. ३ शाळेत अतिशय संस्कारमय झाले आहे. तिथे साजरा होणारा ' शारदेचा उत्सव ' आमच्यासाठी प्रतिवर्षी मोठ्या उत्सवापेक्षा कमी नसायचा. जणू आमच्या घरात सण साजरा होत आहे असे मला वाटे. त्या शाळेत आम्हांला ' साटमबाई ' होत्या. त्या खूप प्रेमळ होत्या. सरस्वती मातेवर त्यांची अपार श्रद्धा होती. त्यांच्यामुळेच आम्ही सरस्वती मातेवर जीवापाड भक्ती करु लागलो. 

          आमच्या वर्गातील एक मुलगा आठवड्यातून एकदा तरी ' फिट ' येऊन जमिनीवर पडत असे. त्यावेळी आमच्या साटमबाई ' सरस्वतीची ' उदी ' त्याच्या छातीला लावत. तो दोन मिनिटात उठून व्यवस्थित झालेला आम्ही कित्येकदा पाहिला आहे. आमची देवीवर श्रद्धा होतीच, पण या घटनेमुळे आमची तिच्यावरील श्रद्धा अधिक दृढ होत गेली. 

          आता मी शिक्षक असल्याने सरस्वती मातेच्या सातत्यपूर्ण सानिध्यात असल्याने तिचे दैनंदिन वरदान लाभते आहे ही जमेची बाजू आहे. आमच्या शिडवणे नं. १ शाळेत दरवर्षीप्रमाणे ' शारदोत्सव ' उत्साहात साजरा करण्यात आला होता. 

          त्यानिमित्ताने सर्व मुलांना सरस्वती मातेची प्रतिमा रंगविण्यास दिली होती. खरंच सांगतो, मुलांना दिलेला उपक्रम खूपच आवडला. सर्वांनी खूप सुंदर पद्धतीने देवीचे चित्र रंगवून आणले होते. त्याच चित्राचे पूजन केले. त्याच चित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले. पालकांनी चित्रे पाहिली. आपली मुले चित्र इतकी छान रंगवू शकतात, याबद्दल त्यांना आपल्या मुलांचा सार्थ अभिमानच वाटला. हा अभिमान मी प्रत्येक पालकांच्या डोळ्यात पाहत होतो. सरस्वतीच्या चित्राच्या वरच्या बाजूला ' शारदे हवे तुझे वरदान ' असे वाक्य छापले होते. त्यामुळे प्रत्येक मूल ते वाक्य वाचून आपल्या विद्येच्या आराध्य दैवताला ' वंदन ' करताना दिसत होते. सुंदर चित्र रंगविणाऱ्या मुलांना जलरंगांची सप्रेम भेट देण्यात आली. इतर सर्वांना रंगीत खडुची पेटी मिळाली.  चित्रकलेला आणि भक्तीला प्रोत्साहन मिळाले. 

          मुलांनी ' सर्वमंगल मांगल्ये ', ' नमस्ते शारदा देवी ' अशी सरस्वती स्तवने म्हटली. मुलांचा, शिक्षकांचा, पालकांचा आणि उपस्थित सर्वांचा आनंद मी टिपत चाललो होतो. सर्वांचा ' सरस्वती ' साठीचा हा एक दिवस अविस्मरणीय ठरला होता. मुलांनो, तुम्ही लक्षात ठेवा, सरस्वती मातेच्या सहवासात राहण्यासाठी तुम्हांला सतत अभ्यास करत राहायला हवे, तर श्रीदेवी शारदामाता तुमच्यावर सदैव वरदहस्त ठेवेल यांत अजिबात शंका नाही. 


©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

Tuesday, October 8, 2024

माझा कब बाळ, गुणाचा गं

 माझा कब बाळ, गुणाचा गं 

          नमस्कार मुलांनो, आपण गेल्या आठवड्यात भेटलो होतो. कसे आहात ? तुम्ही ना माझे सिंहाचे छावे आहात. छावा म्हणजे इंग्रजीत कब ( Cub ) बरं का !!! त्यामुळे तुम्ही नेहमीच काहीतरी धडपड करत असणार हे मला पूर्ण माहित आहे. कारण मी स्वतः तुमचा कबमास्टर आहे. त्यामुळे तुम्हाला घडवत असताना मला खूप महत्वाच्या भूमिका पार पाडाव्या लागतात. तुम्ही मुले माझे विद्यार्थी असता, तेव्हा मी शिक्षक असतो. पण तुम्ही ' कब ' बनता, तेव्हा मी तुमचा ' कबमास्टर ' बनून तुमच्यात असतो. मला तुमच्यासोबत मौज, मस्ती करायला खूप आवडतं. तुम्ही माझे लाडके आहात, तसाच मीही तुमचा लाडका असेन असे मला तरी वाटते. 

          मित्रांनो, गेले दोन दिवस मी माझ्यासारख्या शिक्षकांना ' कब ' चे प्रशिक्षण द्यायला कणकवली आणि वैभववाडी तालुक्यात गेलो होतो. तुमच्या कबमास्टरांशी गप्पा, गोष्टी, गाणी आणि खेळ याविषयी बोलताना मला झालेला आनंद शब्दांत व्यक्त करणं कठीण आहे. तुम्हाला लाभलेले हे सर्व कबमास्टर शिक्षक शिक्षिका अतिशय प्रेमळ आहेत. तुम्हाला लोभ लावणाऱ्या आहेत. तुमचे गुरुजी, बाई किंवा टीचर किंवा सर, मॅडम असं संबोधन लावून तुम्ही त्यांना आदरपूर्वक हाक मारत असाल ना ? तुम्ही जेव्हा प्रेमाने जवळ येऊन हाक मारता तेव्हा आमचा शिक्षकी पेशा खऱ्या अर्थाने सार्थकी लागतो. तुमच्या समस्या न घाबरता सांगताना तुम्ही संकोच करत नसाल, तर तुम्ही एक चांगली गोष्ट करत आहात. एखादे वेळी घरी आईबाबांशी तुम्हाला एखादी गोष्ट कशी सांगू असं वाटत असेल, पण तुमच्या बाई, गुरुजींकडे तुम्ही सहज बोलून मोकळे होता तुमची समस्या !!! तेव्हाच आमच्या या शिक्षकी पेशाची उंची अधिकाधिक वाढत जाते आणि जबाबदारीही वाढते. कारण तुम्ही तुमची समस्या सांगून तुम्ही तुम्हाला आमच्या स्वाधीन करुन टाकलेलं असतं. तुमचा आमच्यावर असलेला हा विश्वासच आमचा पुरस्कार असतो हे सांगताना मला अधिक अभिमानच वाटतो. 

          मी तुमच्यासाठी एक साधा प्राथमिक शिक्षक आहे. तुमच्या सोबत मला अनेक दिवस अतिशय आनंदात घालवायची संधी प्राप्त झालेली आहे. मला या संधीचं सोनं करायचं आहे. आता दसरा येईल, एक दिवस सोनं लुटायला मिळेल. मी तर तुमच्यासोबत दररोजच ' आनंदाचं सोनं ' लुटत आलोय याची तुम्हाला कल्पनाही नसेल. मी आता तुमचा ' कबमास्तर किंवा कबमास्टर ' बनलो आहे. तुम्ही माझे कब बाळ आहात एवढंच मला माहिती आहे. तुमच्यासाठी मला स्वतःला सतत वाचन करत राहायला हवं, नवनवीन गाणी संग्रहित करायला हवीत, ती पुन्हा म्हणून तुमच्याकडूनही म्हणवून घ्यायला हवीत. रोज एकतरी गाणं तुम्हाला सांगण्यासाठी मला जी शोध मोहीम राबवावी लागते, त्याचा मला लागलेला ध्यास तुमच्यावरच्या प्रेमातूनच आलेला आहे. या गाण्यांमधून जे शब्द ऐकायला मिळतात, त्यातूनही तुम्हाला विविध नवनवीन माहिती मिळत राहते. शब्दसंग्रह वाढतो. यमक शब्द सुचतात. कवी मन तयार होतं. गाणी म्हटल्याने तुमची एकाग्रता वाढते. गाणी तुमच्या सहज पाठ होतात, अर्थात तुमची स्मरणशक्ती वाढते. गाण्यांसोबत तुम्ही लय, ताल, सूर शिकता. अर्थात संगीत शिकता. आवाजात बदल करत असताना तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रीत करावं लागतं. तुमच्याकडून अनेक उत्तम गोष्टी घडत राहतात आणि तुम्ही आहात त्यापेक्षा चुणचुणीत गुणी बाळं बनत जाता. तुम्हाला योग्य आकार देण्याचं कार्य करणारे आम्ही ' कबमास्टर ' आहोत. 

          कब बाळांनो, दोन दिवस स्काऊट गाईड कब बुलबुल उजळणी वर्गाच्या निमित्ताने मला ' कबमास्टर ' आणि ' लेडी कबमास्टर ' यांना मार्गदर्शन करण्याची सुसंधी लाभली होती. त्यामुळे मी दोन दिवस तुमच्यात नव्हतो. तरीही मी तिथे तुमचीच आठवण काढत होतो. तुम्ही माझी गुणी बाळं आहात, तुम्ही अधिक गुणसंपन्न व्हा म्हणजे ' कबमास्टर ' म्हणून माझा आनंद गगनात मावेनासा होईल. 


प्रवीण अशितोष कुबल, मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १

Monday, September 16, 2024

🛑 चिंतन हा चिंतामणी

🛑 चिंतन हा चिंतामणी

          गणेश चतुर्थीला आपल्या चिंतामणीचं दर्शन आपल्याला घडलं आहे. सर्व चिंतांना दूर पळवणारा हा चिंतामणी. हा लेख वाचेपर्यंत तुम्हां मुलांची ' गणेश चतुर्थी सुट्टी ' नंतर शाळा सुरु झालेली असेल ना ?

          नमस्कार मुलांनो, कसे आहात सगळे ? चिंतामुक्त झालात ना ? शाळा सुरु झाली म्हणून चिंताग्रस्त तर झाला नाहीत ना ? तशीही शाळा तुम्हाला खूपच आवडते म्हणा. गणपती जसा आवडीचा, तशी शाळा तुमच्या लाडकीची म्हणायला हरकत नाही. 

          आज आपण आपलं चित्त एका वेगळ्या गोष्टीकडे केंद्रीत करणार आहोत. आपण ' चिंतन ' करणार आहोत. आपल्या गणपतीला ' चिंतन ' करायला खूप आवडे. आपण त्याची ही सवय जोपासुया. चिंतन करायला हवं म्हणजे नेमकं काय करायचं ? हा प्रश्न तुम्हाला पडणार हे मला माहिती आहे. 

          तुम्ही एखादी गोष्ट करता म्हणजे काय करता ? ती करण्यापूर्वी विचार करता. हा विचारच तुम्हाला एखादी चांगली किंवा वाईट गोष्ट करण्यासाठी प्रेरित करीत असतो. तुम्ही कितीतरी गोष्टी करत असता. ती चांगली आहे असे तुम्हाला वाटत असेल. पण ती चांगली नाही असे तुम्हाला नंतर कळते. मोठी माणसे तुम्हाला त्याची जाणीव करुन देत असतात. त्यावेळी तुम्हाला रागही येतो. कारण तुम्ही केलेली गोष्ट तुम्हाला बरोबर आहे असे वाटणे साहजिकच असते. ती खरंच चुकीची होती किंवा बरोबर होती याचा तुम्ही सारासार विचार करु लागता, तेव्हा तुम्ही जो विचार करत असता, ते म्हणजे ' चिंतन ' असते. 

          आज आणि सतत हे चिंतन करणे खूप गरजेचे बनले आहे. कारण या चिंतनाने तुम्ही स्वतःच स्वतःचे मूल्यमापन करत असता. स्वतः स्वतःचे मूल्यमापन करणे कधीही चांगले असते. कारण तुम्ही तुमच्या वाईट सवयी घालवण्यास स्वतःच स्वतःला मदत करत असता. बघा, तुम्हाला नक्की जमेल.

         " प्रयत्ने वाळूचे कण रगडीता, तेलही गळे " या सुवचनानुसार तुम्ही सतत प्रयत्नांची कास धरुन चाला तरच तुमचा कस लागेल. तुमच्या चिंता दूर करणारा चिंतामणी तुमच्या सोबत आहेच. तुम्हाला चिंता सतावू नये. तुम्ही तिचा अजिबात बाऊ करायचा नाही. चिंतेने चिंताग्रस्त व्हायचे नाही. त्रयस्थपणे विचार करायचा. चिंतन करुन त्यातून सन्माननीय मार्ग काढायचा. स्वतःच स्वतःचे मार्गदर्शक बनायचे. तुम्हाला मार्ग सापडताना दिसेल तेव्हा तुम्हाला जो आनंद झालेला असेल, त्याचे वर्णनही तुम्ही करु शकणार नाही. 

          लहानपणी मी रेडिओवर ' चिंतन हा चिंतामणी ' नावाचा कार्यक्रम नेहमी ऐकत असे. त्याचा मला खूपच फायदा झाला. आता तुमच्याकडे रेडिओ नसेल हे मला माहिती आहे. कारण त्याची जागा आता मोबाईलसारख्या यंत्राने घेतली आहे. त्याचा उपयोग जरुर करा, पण त्याच्या आहारी अजिबात जाऊ नका. नाहीतर त्यावर ' चिंतन ' करा आणि त्यावर तुमचं काय मत तयार होतं ते लिहून काढा. माझ्या लाडक्या मुलांनो, तुम्ही खूप चांगली मुलं आहात, अधिक चांगली व्हा. मला तुम्हाला खूप मोठं झालेलं बघायचं आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शिडवणे नं. १

🛑 शाळा करा रे प्रसन्न

🛑 शाळा करा रे प्रसन्न

          शाळा हे प्रत्येकाच्या जीवनात अनेक वर्षांसाठी आलेलं विद्येचे घर आहे. या शाळेला अनेकांनी जवळ केलं, ज्यांनी जवळ केलं ते शिकले. ज्यांना शाळेची भिती वाटली, त्यांनी शिकायचा कंटाळा केला, अर्थात शिक्षणच त्यांच्यापासून दूर गेलं. 

          पूर्वीच्या शाळा आणि आताची शाळा यात जमीन अस्मानाचा फरक पडला आहे. पूर्वीच्या शाळा मुलांनी भरभरून वाहणाऱ्या असत. गावाकडच्या आमच्या शाळांत मुलांना बसायला जागा नसे. शिक्षकांची संख्या भरपूर असे. एकूणच शाळेत जायला शिक्षकांची आपुलकी कारणीभूत असे. मारकुटे शिक्षक असले तर त्यांच्याबद्दल आधीच गावभर समजे. त्यामुळे मुले भीतीनेच शाळेची पायरी चढत नसत. आता मात्र मारकुटे गुरुजी राहिलेले नाहीत. असले तरी त्यांना मुलांना मारण्याची परवानगी शासनाने अजिबातच दिलेली नाही. त्यामुळे मुलांना मारणाऱ्या शाळा आज असू नयेत असे शासन वारंवार सांगते. अर्थात मुलांना न मारता अध्यापन करुन त्यांचे अध्ययन घडवणे तारेवरची कसरतच आहे. 

          आज सर्व शाळा प्रसन्न आहेत. शाळेत मुलांची संख्या कमी आहे. प्रत्येक मुलाकडे वैयक्तिक शिकवता येण्यासारखी परिस्थिती आहे. शाळेत सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत. शाळेतील शिक्षक पदव्युत्तर पर्यंत शिकलेले आहेत. ते स्वतः तंत्रस्नेही आहेत. मुलांना तंत्रस्नेही बनवत आहेत. 

          वर्गखोल्या मुलांशी बोलत आहेत. शिक्षक विविध उपक्रम राबवत आहेत. दप्तराविना शाळा, आनंददायी शनिवार असे उपक्रम मुलांसाठी उपयुक्त ठरत आहेत. मुले प्रसन्न होत आहेत. मुले प्रसन्न होण्यासाठी शिक्षक आपल्या जीवाचे रान करत आहेत. प्रसन्न शिक्षक असल्यामुळे मुले प्रसन्न होत आहेत. मुले आणि शिक्षक हेच शाळेचे प्राण आहेत. तेच शाळेत नसतील तर शाळा प्रसन्न आहे असे कसे म्हणता येईल ? कमी पटसंख्या असली तरी त्यांना शिकविण्यासाठी तेवढीच शैक्षणिक कामे करावी लागतात. सुट्टीच्या काळात शाळांच्या इमारती पाहाव्यात, मुले नसल्याने त्या गप्प गप्प असतात. या शाळांचा प्राण असणारी मुले आणि त्यांना हासून हसवून खेळून शिकवणारे शिक्षक नसतील तर नेहमीच प्रसन्न असणाऱ्या शाळा अप्रसन्न दिसल्याशिवाय राहणार नाहीत.

          शाळा, मुले, पालक, ग्रामस्थ, देणगीदार, अधिकारी, शासन आणि शाळेशी संबंधित यंत्रणा जेव्हा मुलांच्या गुणवत्तेसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी निष्ठेने कार्य करत असतात, तेव्हा तिथल्या शाळा सदासर्वकाळ प्रसन्न राहतील यात कोणतीही शंका वाटत नाही. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक शिडवणे नं. १

Saturday, September 7, 2024

🛑 तू बुद्धी दे या बालका

🛑 तू बुद्धी दे या बालका

          चतुर्थीला शाळेला सुट्टी असते. गणपतीच्या येण्याची सर्वांना आतुरता असते. शाळेतील मुलांना तर ती खूपच असते. ती तर गणपती सुट्टीची वाटच बघत असतात. सुट्टी पडते एकदाची. मुलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळतो. हा मुलांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी तर गणेशाचे आगमन झालेले असते. 

          शाळेत शिक्षकांनी अभ्यास दिलेला असतो. मुलांना अभ्यास हवा सुद्धा असतो आणि नको सुद्धा असतो. शाळेत असताना अभ्यास हवा असतो , पण एकदा घरी गणपती आला की या दिलेल्या अभ्यासाचे त्यांना ओझे वाटू लागते. हल्ली दप्तराचे ओझे होते म्हणून तोलून मापून भरलेले दप्तर शाळेत आणावे लागते. ते ओझेच नको म्हणून दहा दिवस शनिवारी ' दप्तराविना ' शाळा उपक्रम सुरु केला आहे. मुलांना ' आनंददायी शनिवार ' च्या रुपाने अधिक ज्ञान मिळवण्याची संधी मिळालेली आहे. मुलांनी या संधीचे सोने करायला हवे. 

          काही शाळांमध्ये दर व्हेकेशनला प्रिंटिंग अभ्यास दिलेला असतो. मुलांनी घरी काहीतरी वाचन करावे, लेखन करावे, उदाहरणे सोडवावीत अशी माफक अपेक्षा असते. या सरावामुळे मुले नियमित वाचत लिहत रहावीत हा उद्देश असतो. हा उद्देश काही मुले संपूर्णपणे अभ्यास करुन पूर्ण करतात. काही मुले त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात. त्यांना या उपक्रमशील अभ्यासाचे ओझे वाटते. 

          गणपती ही बुद्धीची देवता आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना गणपतीची आराधना केली जाते. या गणनायकाची मुले जितकी भक्ती करतील तितकी अभ्यासावरची त्यांची पकड घट्ट होत जायला हवी आहे. केवळ भक्ती करुन उपयोगाची नाही. शाळेत दिलेला अभ्यास करणारी मुले गणपतीला जास्त आवडतील. पाठांतर तर आजकाल लुप्त होत चालले आहे. मुलांनी विविध गोष्टी, कथा, कविता, गाणी पाठ कराव्यात. आरत्या पाठ करुन न बघता म्हणाव्यात. या पाठांतराचा उपयोग पुढे भाषण करताना नक्की होणार आहे. निबंध लिहिताना , स्वतःचे मनोगत व्यक्त करताना नक्की होणार आहे. 

          मुलांनो, म्हणूनच मी तुम्हाला प्रेमाची विनंती करतो की कोणत्याही सुट्टीत दिलेला अभ्यास हा सरावासाठी दिलेला असतो. तो केल्याने तुम्ही अभ्यासाच्या प्रक्रियेत राहता. तुम्ही शाळेत नुकताच शिकलेला अभ्यास अधिक लक्षात ठेवू शकता. तुमची स्मरणशक्ती वाढते. तुमचे सर्व पाढे पाठ असतात, त्यामुळे गुणाकार, भागाकार या मूलभूत क्रिया करताना तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. 

          माझ्या लाडक्या मुलांनो, सुट्टी ही तुमच्यासाठी मौजेची असली तरी तिचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी नक्की करा. वाईट गोष्टी सतत खुणावत राहतात. त्या तुम्हाला कराव्याशा वाटतात, पण त्यांना तुम्ही बाय बाय म्हणा. चांगल्या गोष्टी शिका, नवीन गोष्टी आत्मसात करा. हे गणपतीदेवा, माझ्या मुलांना चांगली बुद्धी दे अशी मी तुझ्याकडे प्रेमळ मागणी करीत आहे. 

©️ प्रवीण अशितोष कुबल

 मुख्याध्यापक , शाळा शिडवणे नं.१


Tuesday, September 3, 2024

🛑 आधी गणाला मनी साठवावा

🛑 आधी गणाला मनी साठवावा


          गणेश चतुर्थीचे दिवस जवळ आले कि सगळ्यांचीच लगबग सुरु होते. मुलांना सुट्टी पडणार म्हणून मुले खुशीत असतात. आकारिक चाचणी पहिली पार पडलेली असते. शाळेत विविध उपक्रम सुरुच असतात. विविध स्पर्धा परीक्षांचे अर्ज भरण्याची रस्सीखेच सुरु झालेली असते. 

          मुले घरातील सजावटीत रमलेली असतात. भिंतीना रंग, सफाई, मखर बनवणे, गणेशमूर्ती बघायला जाणे अशी कामे मुलांची आवडीची. अभ्यासापेक्षा मुले यात जास्त रमतात. त्यात त्यांना आपल्या बाप्पाच्या आगमनाची चाहुल लागलेली असते. कधी एकदा तो दिवस येतो असे त्यांना झालेले असते. तबला, डग्गा, सुरपेटी, ढोलकी, मृदूंग आणि चकी ( झांज )  यांना बाहेर काढण्यात येते. खूप दिवसानंतर आपल्यावर थाप बसणार म्हणून वादयेही खुशीत वाजू लागतात. 

          घरातलं वातावरण पूर्ण उत्साहाच्या धबधब्यांनी  न्हाऊन निघतं. मुंबईची मंडळी नेहमीच दोन दिवस अगोदर येतात. त्यांची ' मुंबईची बोली ' घरोघर घुमू लागते. मराठी आणि गावाकडच्या मिश्र भाषेने गप्पा रंगून जातात. चाकरमानी आल्यामुळे गावाकडले म्हातारेशितारे पुन्हा तरुण बनून कामात हातभार लावू लागतात. 

          पताका कापून त्या लावण्यातील मज्जा काही औरच असते. सर्व भिंतीवर कॅलेंडरे झळकू लागतात. गणपतीची खोली हा हा म्हणता सजून जाते. बाप्पासाठी आरास करताना अजिबात कंटाळा येत नाही. अंगातील आजारपण कुठल्या कुठे निघून जाते.

          छतांवर रंगीबेरंगी पडदे झुलू लागतात. बघावं तिकडे पाहत राहावं असं वातावरण असतं. एवढं प्रसन्न चित्त होण्यासाठी फक्त एकमेव ' गणपती बाप्पा ' कारणीभूत असतो. 

          हौशी भजन मंडळे तयारीला लागतात. त्यांची रंगीत तालीम सुरु झालेलीच असते. एकापेक्षा एक उडत्या चालीवर गाणी बसविण्याची जणू स्पर्धाच सुरु होणार असते. गणपतीवर कित्येक गाणी रचली जाण्याचा काळ असतो हा. सारेजण गणपतीमय होऊन जातात. जीवनातील अनेक प्रसंगांना तोंड देताना त्यावर मात करायला शिकवणारा प्रत्येकाचा ' माझा बाप्पा ' तनमनात येत राहत असतो. 

          चतुर्थीचा दिवस उजाडतो आणि आनंदाला उधाण येते. आपल्या बाप्पाचं आगमन प्रतिवर्षी हवंहवंस वाटणारं असंच असतं. घरातील मुलेमाणसे गणपतीसाठी एकत्र गुण्यागोविंदाने नांदताना पाहून थोरामोठ्यांची छाती फुलून येते. आरत्या, भजने आणि खाद्यपदार्थांची रेलचेल सुखावून जाते. माणसे तनाने आणि मनाने सुद्धा अधिकाधिक जवळ येऊ लागतात. 

          गणपतीसाठी आतून आतुर झालेली माणसे पाहून हा गणेशोत्सव कधी संपूच नये असं वाटत राहत असतानाच त्याच्या विसर्जनाच्या वेळी डोळ्यातून पाणी तरळते. म्हणूनच म्हणावेसे वाटते, " आधी गणाला मनी साठवावा " 

©️ प्रवीण अशितोष कुबल

मुख्याध्यापक, शाळा शिडवणे नं. १











Thursday, July 25, 2024

🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव

🛑 इको क्लब्स मिशन लाईफ : एक पर्यावरण जाणीव 


         सध्याचे जीवन अतिशय धकाधकीचे, स्पर्धेचे आणि अतीतणावाचे झाले आहे. तणावाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही आणि त्याशिवाय दिवस संपतही नाही. या तणावांचा सामना मोठ्यांनाच नव्हे तर लहानांना देखील करावा लागत आहे. सुट्ट्या पडल्या तरी हा तणाव त्यांची पाठ सोडत नाही. काहीवेळा थोडा तणाव हा जीवनावश्यक असतो असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. या तंत्रज्ञानाच्या युगात सर्वजण तंत्रस्नेही बनत चालले आहेत. जेवढे तंत्रस्नेही बनतील तेवढे त्यांचे तणाव वाढतील. तंत्रस्नेही बनणे जरुरीचे असले तरी त्यामुळे माणसांची जीवनशैली बदलत चालली आहे. 

कित्येक तास मोबाईलवर , लॅपटॉपवर किंवा टॅबवर अभ्यास करणारी मुले पाहिली कि त्यांची खरंच चिंता वाटू लागली आहे. विविध आभासी गेम्स खेळणारी मुले पाहूनही त्यांच्या भावी जीवनाचे काय होईल याची कल्पनाच करवत नाही. एकूणच काय आपल्या दैनंदिन जीवनाचे ‘ मिशन लाईफ ’ भरकटत चालले आहे. ही भरकटणारी जीवन नौका व्यवस्थित पैलतीरावर आणावयाची असेल तर पुन्हा एकदा आपल्याला पर्यावरणाविषयी जाणीव जागृती होणे गरजेचे झाले आहे. 

म्हणूनच की काय शासनाने ‘ उन्हाळी शिबीर ’ ही संकल्पना आणलेली असू शकते. मुलांना सुट्टी असताना ५ जून ते ११ जून असे सात दिवस सात थीम्स घेऊन ही संकल्पना उपक्रमस्वरुपात राबवणे असा शासन आदेश आहे. हे शिबीर राबविण्यात अनेकांना अडचणी आलेल्या असू शकतात. पण शाळा सुरु झाल्यानंतर सुद्धा आपण या परिपत्रकाचा आधार घेऊन यावर्षी शालेय दिवसांमध्ये किंवा पुढील मोठ्या सुट्ट्यांमध्ये असे पर्यावरणप्रेमी उपक्रम राबविल्यास मुलांना ताणतणावांचे व्यवस्थापन करण्यास नक्कीची मदत होऊ शकते असे वाटते. 

सुट्ट्या पडल्या की मुलांचे काय करायचे हा यक्ष प्रश्न प्रत्येक पालकांना पडत असतो. मी शिक्षक असलो तरी मी पालक म्हणून ज्यावेळी विचार करतो त्यावेळी मलाही तसेच वाटते. ग्रामीण भागातील मुले सुट्टीच्या काळात शहरात जातात. शहरी भागातील मुले आपल्या गावाकडे सुट्टीचा आनंद घ्यायला जातात. कदाचित हा काळ म्हणजे त्यांच्यासाठी एक प्रकारे उन्हाळी शिबीरच आहे असे म्हटले तरी वावगे ठरु नये. पण त्यात नियोजनबद्धता नसते. त्यात विविध मर्यादा पडतात. सुसंस्कार होतील याची गॅरंटीही नसते. त्यामुळे जे पालक आपल्या मुलांसाठी पैसे खर्च करू शकतात , ते पालक आपल्या मुलांना अशा खाजगीत होणाऱ्या उन्हाळी शिबिरांना पाठवतात. तिथे मुलांना स्वतःची कामे स्वतःच करावी लागतात. मुलांचा पूर्ण दिवस वेळापत्रकाप्रमाणे आखलेला असतो. कधी काय उपक्रम करायचा हे लेखी स्वरूपात लिहिलेले असते. खाणे , पिणे , हुंदडणे आणि बरेच काही घड्याळाच्या काट्यावर चाललेले असते. सर्वसामान्य मुलांच्या पदरात या गोष्टी पडतच नाहीत. त्यांना घरची कामे करावी लागतात. सुट्ट्या त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या विकासासाठी पोषकच असतील हे सांगता येत नाही. तरीही ही मुले सुट्टीचा आनंद घेतातच. आपल्या जवळच्या आजोळी जाऊन मामाच्या घरी आनंद घेणारी मुले मी प्रत्यक्ष पाहिली आहेत. मी स्वतःही अशा अनियोजनबद्ध शिबिराचा आनंद घेऊन मोठा झालो आहे. पण पालक झाल्यानंतर माझी मुले नियोजनबद्ध उन्हाळी शिबिराचा भाग बनावीत असे मला कित्येकदा वाटले आहे. पण मी काही माझ्या मुलांना शिबिरांचा लाभ देऊ शकलेलो नाही. 

आजच्या शिक्षकांना दररोज विविध उपक्रम राबविण्याचा तणाव नक्की येत असेल. तरीही आपल्याला जमेल तसे उपक्रम राबविण्याचा प्रयत्न प्रत्येकजण आपापल्या परीने करताना दिसत आहेत. उपक्रम राबवले म्हणजे आपण यशस्वी होत नसतो. त्यांची फलनिष्पत्ती दिसली कि आपल्याला लाखमोलाचे समाधान वाटत असते. आजची मुले जीवनात पुढे यशस्वीपणे झुंज देण्यासाठी सक्षम बनविण्याची बिजे या उपक्रमांत असतात. आपल्या मुलांची ही पिढी भावी आयुष्यात सकारात्मकतेने , सुदृढतेने जीवन जगताना दिसतील तेव्हाच आपल्या उपक्रमांना यश मिळाल्याचे लक्षात येईल. 

त्यासाठी मुलांनी निसर्गावर प्रेम करायला शिकायला हवे. निसर्गफेरी आयोजित करून आपण त्यावर काही प्रमाणात मात करू शकतो. परिसरात झाडे लावून त्यांचे जतन करताना मुलांचे वृक्षप्रेम जागृत होईल. आपल्या जवळपास पर्यावरणप्रेमी क्षेत्रभेटी आयोजन करत असताना मुले भावी उद्योजक बनू शकतात. ही पहिल्या दिवसाची थीम आहे. 

शाळेत पोषण आहार सुरु आहे. त्यात शाळेत पिकविलेल्या भाज्या शिजवून देताना त्यांच्यात श्रमप्रतिष्ठा निर्माण होईल. परसबागेचे उपक्रम त्यासाठीच तर आहेत. जेवल्यानंतर उरणारे अन्न किंवा कचरापेटीत टाकावयाचे अन्न म्हणजे ओला कचरा आहे. त्याचेही व्यवस्थापन त्यानिमित्ताने मुलांना समजावे हा हेतू आहे. मुलांनी हा ओला कचरा स्वतः शोषखड्ड्यात टाकावा , त्याचे बनलेले कंपोस्ट खत आपल्या परसबागेत वापरता येते. ही जी जीवनशैली आहे ती खरी आरोग्यशैली आहे याची ओळख या अशा इको क्लबमधून दिल्यास अधिक उत्तम होईल.ही दुसऱ्या दिवसाची थीम आहे. 

सध्या शाळेमध्ये विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणे वापरली जातात. त्यांच्या सततच्या वापराने ती खराब होत असतात. त्यामुळे तो सुद्धा एक कचराच होतो. त्याचा कसा निचरा करावा हेसुद्धा मुलांना या तिसऱ्या दिवसाच्या थीममधून सांगणे अपेक्षित आहे. त्यासाठी अशा कचऱ्याचा विल्हेवाट लावणाऱ्या संस्थांशी संपर्क करणे ही पुढील काळाची गरज असणार आहे हेही मुलांना समजाविता आले तर त्याचाही मुलांना पुढील जीवनात फायदाच होणार आहे. 

शालेय जीवनात परिपाठापासून सफाई कामाला सुरुवात होते. मोठ्या शाळेमध्ये परिसर मोठा असतो , त्यामुळे सुका कचरा जास्त असतो. पोषण आहार योजनेत ओला कचरा निर्माण होतो. दोन्ही कचऱ्याचे व्यवस्थापन मुलांना शिकविले गेले पाहिजे. त्याचा उपयोग ही मुले आपल्या घरी देखील करतील. कचरा व्यवस्थापन केल्यामुळे आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे. कचरा म्हणजे टाकाऊ वस्तू असतात. या टाकाऊ वस्तू सुद्धा काहीवेळेला टिकाऊ करण्याची क्षमता मुलांमध्ये आणली जाऊ शकते. मुले कल्पक असतात , त्यांना हे काम दिले कि मुलांच्या विचारचक्राला चालना मिळते. मुले टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवून विधायक कार्य करण्यास प्रेरित होतात. पुढील आयुष्यात त्यांना अशा अनेक संकटांना तोंड देताना या कौशल्याचा उपयोग हमखास होणार आहे. ही चौथ्या दिवसाची थीम आहे. 

पाचव्या दिवशी मुलांची ‘ ऊर्जा समिती ’ स्थापन करावयाची आहे. अक्षय ऊर्जा या विषयावर मुलांना एखादे प्रबोधनपर व्याख्यान देता आले तर नक्की आयोजन करावयाचे आहे. सौर ऊर्जेचा वापर करुन आपली कामे मार्गी लावता येतात हेही त्यांना समजून सांगण्याची वेळ आलेली आहे. शाळेमध्ये सौर ऊर्जा पॅनल देखील असू शकतात. त्यांचा वापर करुन आपण एक प्रकारे ऊर्जेची बचतच करत आहोत हेही मुलांना समजू शकेल. ऊर्जा संवर्धनाकरिता मुलांची पोस्टर स्पर्धा देखील आपण आयोजित करू शकतो. 

शाळेमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय केलेली असते. पाणी हे जीवन आहे. ते कमी असताना किंवा टंचाई असताना आपण ते जपून वापरतो. परंतु ते मुबलक प्रमाणात असले तरीही ते जपूनच वापरले पाहिजे ह्या सवयी मुलांच्या अंगी रुजविणे यातून शक्य होऊ शकते. शुद्ध , अशुद्ध पाणी आणि जलसंधारण विषयक मार्गदर्शने आयोजित करता येऊ शकतात. ही सहाव्या दिवसाची थीम आहे. 

शाळांमध्ये हल्ली प्लास्टिक पिक अप डे साजरे केले जातात. प्लास्टिक कचरा ही पर्यावरणाची फार मोठी समस्या आहे. मुलांनी प्लॅस्टिकच्या वस्तू न वापरता किंवा त्यापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता भावी जीवनात जागृत व्हावे हा यामागील हेतू आहे. मुलांनी जाणीवपूर्वक प्लास्टिकरहित वस्तूंचा कायम वापर करावा अशा सवयी लावता आल्या तर ही समस्या बऱ्याच प्रमाणात कमी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याबाबत शाळेत पोस्टर मेकिंग स्पर्धा , वादविवाद स्पर्धा , घोषवाक्ये स्पर्धा इत्यादी घेता येऊ शकतात. 

ही या उन्हाळी शिबिरातील सातव्या दिवसाची थीम आहे. 

अर्थात असे सप्ताह किंवा शिबिरे आयोजित करुन मुलांच्या , पालकांच्या आणि समाजाच्या मनात विविध समस्यांची जाणीव निर्माण करुन देणे हे आपल्या शिक्षण व्यवस्थेचे काम आहे. हे काम निरंतर करणे ही खरी गरज आहे. पण याद्वारे जागृत झालेली मुलांची मने पुढे अधिक समृद्ध आरोग्यदायी पिढी घडवतील अशी आशा बाळगूया. 


Ⓒ प्रवीण अशितोष कुबल , मुख्याध्यापक शाळा शिडवणे नं. १ 


मार्गदर्शक : शिक्षण परिषद , २५ जुलै २०२४ : केंद्र शेर्पे व खारेपाटण 



 

गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम

  गणेशोत्सव: निरागस भक्ती आणि प्रेम      गणेश चतुर्थीचा सण अवघ्या दोन दिवसांवर आला आहे. संपूर्ण गाव, विशेषतः शाळेतील मुलं, गणपती बाप्पाच्या ...